पुणे येथील ससून रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू !

पुणे – येथील ससून रुग्णालयात उपचार चालू असलेल्या ३० वर्षीय सागर रेणुसे या तरुणाला अतीदक्षता विभागामध्ये त्याच्या डोके, कान आणि इतर अवयव यांचा उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन या तरुणाचा मृत्यू झाला, असा आरोप तरुणाच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळ आधुनिक वैद्यांनी या गोष्टीला नकार दिला. ज्या वेळी नातेवाइकांनी गोंधळ घातला, त्या वेळी त्यांनी उंदीर चावल्याचे मान्य केले. हा प्रकार पाहून नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते.

तरुण मुलगा गेल्याने रेणुसे परिवारावर शोककळा !

सागर रेणूसेचा केवळ अपघात झाला होता. योग्य उपचार होऊन सागर बरा होईल, अशी नातेवाइकांना अपेक्षा होती. काही प्रमाणात गंभीर मार लागल्याने त्याला ससूनमधील अतीदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले होते; मात्र ससून रुग्णालयातील अस्वच्छता आणि भोंगळ कारभार यांमुळे सागरचा जीव गेला. ३० वर्षांचा सागर अचानक गेल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.

संपादकीय भूमिका

  • सरकारी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू होणे, हे रुग्णालय आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद !
  • अतीदक्षता विभागामध्ये २४ घंटे परिचारक आणि कर्मचारी असतांना तेथे उंदीर असल्याचे कसे लक्षात आले नाही ? अतीदक्षता विभागात रुग्ण सुरक्षित नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !