साधकांनो, ‘मनमोकळेपणाने बोलणे’, म्हणजे ‘मनाचा त्याग आणि अहं-निर्मूलनाची संधी’ आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.

सुश्री (कु.) दीपाली होनप

१. एखाद्या प्रसंगात आपले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू उफाळून आलेले असतात. खरेतर कधी कधी आपल्यातील अहंमुळे आपल्याला त्याविषयी कुणाशी बोलायचे नसते; पण साधनेत पुढे जाण्यासाठी आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन म्हणून आपण त्या संदर्भात संबंधित साधक किंवा उत्तरदायी साधक यांच्याशी बोलतो. येथे आपल्या स्वेच्छेचा त्याग होतो.

२. त्या प्रसंगात आपण आपली विचारप्रक्रिया सांगत असतांना आपले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू उलगडले जातात, तसेच समोरील साधकही आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देऊन त्यांवर साधनेचा योग्य दृष्टीकोन देत असतो. त्यामुळे आपल्या मनाचा त्याग होतो, तसेच ही अहं-निर्मूलनाचीही संधी असते.

३. मनमोकळेपणाने बोलल्याने मनाचा त्याग झाल्याने आणि विचाररूपी अहंकाराचे ओझे दूर झाल्याने आपले मन हलके होते अन् आपल्याला आनंद मिळतो.

४. समोरच्या साधकाने योग्य दृष्टीकोन दिल्याने आपल्या साधनेला योग्य दिशा मिळते, तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते.

५. मनमोकळेपणाने बोलल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या विचारांमुळे आपल्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होते. त्यामुळे मनमोकळेपणाने बोलल्यानंतर आपली साधना आणि सेवा यांची गुणवत्ता वाढते.

मनमोकळेपणाने बोलण्याचे केवळ एक पाऊल उचलल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आपण साधनेत अनेक पावले पुढे जात असतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मनमोकळेपणाने बोलून त्यांचे आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यामागील त्यांच्या संकल्पाचा लाभ करून घेऊया !’

– सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२४)