स्वभावदोषांच्या निवारणासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री. अग्निवल्लभ : गुरुदेव, आरंभीच्या टप्प्यात प्रक्रिया (टीप) करतांना मला काही जमत नव्हते. तेव्हा मी सौ. सुप्रिया माथूर (प्रक्रियेच्या आढावासेविका, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) किंवा पू. रेखा काणकोणकर (सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत) यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हतो. आता त्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक अर्ध्या घंट्याने मी मनातले सर्व विचार लिहून काढून त्यांना दाखवतो आणि त्यावर स्वयंसूचना करून घेतो.

(टीप – अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया
आ. स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका वहीत लिहून त्या पुढे ‘त्या चुका कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या ?’ ते लिहिणे आणि ‘तशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी त्यापुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून त्या दिवसातून १० – १२ वेळा मनाला देणे)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दिवसातून किती वेळा स्वयंसूचना घेतोस ?

श्री. अग्निवल्लभ : १२ ते १५ वेळा

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आज १२ – १५ सूचना आणि उद्या वेगळ्या १२ – १५ सूचना घेतोस; पण मग आज घेतलेल्या सूचना उद्या घेत नाहीस का ? एक लक्षात ठेव. एका प्रसंगाविषयीची स्वयंसूचना दिवसातून न्यूनतम ३ – ४ वेळा घ्यायला पाहिजे. अशा २ – ३ प्रसंगांवर दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घ्यायच्या. नंतर पुढच्या आठवड्यात दुसरी २ – ३ सूत्रे घ्यायची. त्याही सूत्रांवर एक आठवडाभर दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घ्यायच्या. तोपर्यंत मनात दुसरे विचार आले, तर ते वहीत लिहून ठेवायचे. अशा पद्धतीने एक आठवडाभर २ – ३ प्रसंगांवर स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या २ – ३ प्रसंगांवर स्वयंसूचना घ्यायच्या. प्रतिदिन नवीन नवीन सूत्रावर स्वयंसूचना घ्यायची नाही. हे सूत्र सगळ्यांना सांग.

श्री. अग्निवल्लभ : हो गुरुदेव. सुप्रियाताईंशी बोलल्यावर मला पुष्कळ सूत्रे शिकायला मिळाली. मी ती सर्व सूत्रे लिहून ठेवली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण नुसते लिहून ठेवून काही उपयोग नाही. स्वयंसूचना नुसत्या बाह्यमन आणि बुद्धी यांना द्यायला नको, तर त्या अंतर्मनापर्यंत पोचल्या पाहिजेत. कळले ?, म्हणजे लवकर बाहेर पडशील.

श्री. अग्निवल्लभ : हो गुरुदेव.

( क्रमश : )