संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

  • कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा’द्वारे भक्तांची एकमुखी मागणी

  • संभाव्य सरकारीकरण रहित करण्याचीही मागणी

  • मोर्चासाठी ६०० हून अधिक भक्तांची उपस्थिती

कोल्हापूर येथे बाळूमामा भक्तांच्या वतीने काढण्यात आलेला ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा’ !

कोल्हापूर – असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्‍वस्त दोषी आहेत, त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सीआयडी’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण न करता मंदिराचे व्यवस्थापन भक्तांकडे सुपूर्द करावे, अशी एकमुखी मागणी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा’द्वारे करण्यात आली. बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी ६०० हून अधिक भक्तांची उपस्थिती होती. मोचार्र्च्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. ‘हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवू’, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देतांना भाविक, भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ

मोर्चात देण्यात आलेल्या घोषणा !

या प्रसंगी ‘नाही होऊ देणार, नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण, नाही होऊ देणार’, ‘मशीद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी, तर मग बाळूमामांच्या मंदिराचेच सरकारीकरण का ?’, ‘बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे’, ‘नको शासक नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक !’, यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.

कोल्हापूर येथे बाळूमामा भक्तांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात घंटा आणि ढोल घेऊन सहभागी भाविक

मान्यवरांचे मनोगत

मोर्चाच्या समारोपप्रसंगी बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष श्री. निखिल मोहिते-कुराडे म्हणाले, ‘‘संत बाळूमामा देवस्थानामध्ये प्रशासक नेमल्याचे दुष्परिणाम भाविक-भक्त सध्या भोगत आहेत. संत बाळूमामांच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, भाविकांसाठी प्रसाधनगृह नाही, प्रसादाची गैरसोय होते. भक्तांना अशा प्रकारच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बाळूमामांच्या बग्यातील ज्या बकर्‍या आजारी पडतात, त्यांना पहाण्यासाठी डॉक्टर नाहीत, त्यांना वेळेवर औषधे मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.’’ उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘मंदिरावर प्रशासक नेमून भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हडप करण्याचे षड्यंत्र भक्तगण उधळून लावतील.’’

कोल्हापूर येथे बाळूमामा भक्तांच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाच्या समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना श्री. सुनील घनवट

या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वर्ष १९६६ मध्ये संत बाळूमामा यांचे समाधी मंदिर स्थापन झाले आणि वर्ष २००३ मध्ये पहिल्यांदा विश्‍वस्त मंडळ अस्तित्वात आले. विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

३ मास बकर्‍यांची विक्री बंद असल्यामुळे मंदिराचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्याला उत्तरदायी असणार्‍यांवर कधी कारवाई होणार ? त्यामुळे हे मंदिर प्रामाणिक भक्तांच्या कह्यात द्यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.’’ या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, सर्वश्री गजानन तोडकर, किरण कुलकर्णी, रामभाऊ मेथे आणि सुनील सावंत यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर

बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष श्री. निखिल मोहिते-कुराडे, उपाध्यक्ष मानतेश नाईक, दयानंद कोनकेरी, सरदार खाडे, सिद्धार्थ एडके, संजय शेंडे, सागर पाटील, देवदास शिंदे, संत बाळूमामा यांची प्रत्यक्ष सेवा केलेले भक्त चंदूलाल शहा-शेठजी यांचे पणतू परेश शहा-शेठजी, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस आणि श्री. अक्षय ओतारी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर,  भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह नागाव, शिरोली, भुये, शिये, निगवे आणि मुदाळ या गावांतून धर्मप्रेमी अन् भक्त उपस्थित होते.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –

क्षणचित्रे

१. श्री. बापू गावडे यांच्या पुढाकाराने टोप आणि शिरोली येथून संत बाळूमामा यांचे भक्तगण ढोल घेऊन आले होते.

२. ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत हे संत बाळूमामा यांची वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते.

३. या मोर्चात पिवळा भंडारा लावून, तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तगण सहभागी झाले होते.