१४ फेब्रुवारीला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’ !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत सन्मान !

मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क, दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ’ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संयुक्त प्रसिद्धीपत्रक –

अनेक मान्यवरांची उपस्थिती !

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, शिवसेनेचे खासदार श्री. राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार श्री. आशिष शेलार, भाजपचे प्रवक्ते तथा आमदार श्री. अतुल भातखळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार श्री. भरतशेठ गोगावले, ‘सुदर्शन न्यूज ’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे मुंबई अध्यक्ष श्री. प्रवीण दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित असतील, अशी माहिती ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. त्यांच्या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवर येणार आहेत. या सोहळ्याला हिंदु बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याविषयी अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क करावा.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे कार्य

प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज

५०० वर्षांनंतर अयोध्येत  उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराममंदिराच्या उभारणीमध्ये प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी मोलाचे योगदान दिले आहे. इतकेच नव्हे, तर वयाच्या  १७ व्या वर्षांपासून श्रीमद् भागवत, रामायण, महाभारत, योगवसिष्ठ ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मशिक्षणाचे मोठे कार्य स्वामीजींनी केले आहे.

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी श्री जयेंद्र सरस्वती यांनी स्वामीजींना ‘परमहंस संन्यासा’ची दीक्षा दिली. स्वामीजींनी आळंदी (पुणे) येथे आश्रम स्थापन करून भावी पिढ्यांसाठी ‘संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल’, ‘श्रीकृष्ण सेवानिधी न्यास’, ‘महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान’ आदींद्वारे राष्ट्र आणि धर्म यांचे मोठे कार्य चालवले आहे.