बांगलादेशात भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत !

  • बांगलादेशाचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांची ग्वाही !

  • ७ जानेवारीला बांगलादेशमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विधान !

बांगलादेशाचे गृहमंत्री असदुज्जमां खान

नवी देहली – ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.) आणि ‘जमात-ए-इस्लामी बांगलादेश’ या पक्षांच्या सत्ताकाळात भारतविरोधी गटांना प्रोत्साहन देण्यात आले होते. आमचा पक्ष (अवामी लीग) सत्तेत आल्यानंतर अशा गटांवर कारवाई करण्यात आली. आम्ही सत्तेत असेपर्यंत आमच्या देशात भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही प्रतिपादन बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी दिली. ते ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ वृत्तसंस्थेला दूरभाषवरून दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. येत्या ७ जानेवारी या दिवशी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली.

१. असदुज्जमां खान पुढे म्हणाले की, बांगलादेशाचे भारताशी विशेष नाते आहे; कारण बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती. येणार्‍या काळात दोन्ही देशांतील नाते अधिक भक्कम होईल.

२. चीनशी असलेल्या संबंधांविषयी असदुज्जमां खान म्हणाले की, बांगलादेशात चीन करत असलेल्या गुंतवणुकीमुळे भारताला चिंता करण्याची आवश्यकता नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांची तुलनाच होऊ शकत नाही. चीन आमचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधा यांमध्ये गुंतवणूक करत आहे. याचा परिणाम भारतसमवतेच्या आमच्या संबंधांवर होणार नाही. (चीनचा परिणाम बांगलादेशावर होऊ नये, असेच भारताला वाटेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • नुसते असे बोलून काय उपयोग ? जिहादी आतंकवाद्यांना ही भाषा समजते का ? त्यापेक्षा गृहमंत्री खान यांनी हिंदूंवर अत्याचार करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करून ‘भारतविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत’, हे कृतीतून दाखवून दिले पाहिजे !
  • बांगलादेशातील हिंदूंवर आतापर्यंत झालेल्या अत्याचारांविरुद्ध खान यांनी कधी आवाज उठवला आहे  का ?, हेही त्यांनी स्पष्ट करायला हवे, अन्यथा त्यांचे हे विधान म्हणजे ‘बांगलादेशातील उरल्यासुरल्या हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न आहे’, असेच म्हणावे लागेल !