दुर्धर आजारांवर औषधे आयात करून स्वतःची खळगी भरणार्‍या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ म्हटल्याचे प्रकरण

(पनौती म्हणजे पांढर्‍या पायाचे, अशुभ असे)

स्वातंत्र्याला ७ दशके उलटून गेली, तरी १३ दुर्धर आजारांवर लागणारी औषधे लाखो रुग्णांना परवडत नव्हती. भारतामध्ये वेगवेगळ्या १३ दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या वेगवेगळ्या स्थितींमधील रुग्णांची संख्या ८ कोटी ते १० कोटी यांमध्ये आहे. अशा दुर्धर आजारांपैकी १३ आजारांवरील १३ दुर्मिळ औषधांच्या ‘मेड इन इंडिया’ (भारतात उत्पादन केलेली) निर्मितीसाठीचे प्रयत्न मोदी सरकारने गेल्या वर्षी चालू केले. यांपैकी ४ औषधांची निर्मिती करण्यात भारताला यश आले आहे. जागतिक स्तरावरील सध्याची परिस्थिती पहाता भारतासाठी हे फार महत्त्वाचे असून यामुळे प्रचंड प्रमाणात परदेशी चलन वाचण्यासच नाही, तर ते मिळवण्यासाठीही साहाय्य होणार आहे.

१. ४ दुर्धर आजारांवरील औषधे देण्याची सरकारी योजना कार्यान्वित

भारताच्या या यशामुळे दुर्धर आजारांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांची निर्मिती आता देशातच होणार आहे. त्यामुळेच आयातीसह इतरही व्यय वाचणार असल्याने ही औषधे बर्‍यापैकी स्वस्त होणार आहेत. या दुर्धर आजारांपैकी ८० टक्के आजार हे ‘जेनेटिक’ (अनुवांशिक) आहेत, म्हणजेच हे आजार अनेक मुलांना जन्मापासूनच असतात. या आजारांवर उपचार करायचा झाला, तरी तो सर्वसामान्यांना शक्य होत नाही. अनेकदा लोकवर्गणीमधून किंवा सरकारच्या साहाय्याने ‘विशेष प्रकरणे’ म्हणून अशी औषधे मागवली जायची; मात्र आता याची आवश्यकता भासणार नाही. ही औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचीही सरकारची योजना कार्यान्वित झाली असून त्यावर काम चालू आहे.

२. दुर्धर आजारांची नावे

भारताने या दुर्धर आजारांवरील औषधे सिद्ध केली आहेत –

अ. ‘टायरोसेनेमिया टाईप १’ : (हा आजार टायरोसिन अमीनो ॲसिडच्या चयापचय प्रक्रियेत व्यत्यय आणतो, ज्यामुळे मुख्यतः मूत्रपिंड आणि परिधीय नसांसह यकृताची हानी होते. परिणामी यकृत निकामी होऊन यकृत आणि मूत्रपिंड यांचे आजार होऊ शकतात.) वर्षभरासाठी या आजाराच्या औषधांवर साडेतीन कोटी रुपयांचा व्यय व्हायचा. ही औषधे केवळ अडीच लाख रुपयांमध्ये उपलब्ध होतील.

आ. ‘गोशे डिसीज’ (Gaucher – हा दुर्मिळ, अनुवांशिक आणि चयापचय यांच्याशी संबंधित आजार आहे, जो चरबीयुक्त पदार्थांच्या साठवणुकीमुळे होतो.) : आधी या आजाराच्या औषधासाठी अडीच कोटी ते ६ कोटी रुपये व्यय व्हायचा. आता अडीच लाख रुपयांमध्ये यावरील औषध मिळेल.

इ. ‘विल्सनस् डिसीज’ (विल्सन रोग हा क्वचित् आढळणारा असून तो अनुवांशिक असतो. यामध्ये शरिरातील तांब्याच्या चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होऊन मेंदू आणि यकृत या महत्त्वाच्या अवयवांमध्ये तांब्याचा संचय होतो.) : आधी या आजाराच्या उपचारासाठी १ कोटी ८ लाख ते ३ कोटी ६ लाख रुपये वार्षिक व्यय व्हायचा. आता याची औषधे ३ लाख रुपयांमध्ये मिळतील.

ई. ‘ड्रॅवे सिंड्रोम’ (एक प्रकारचा मेंदू विकार) : याच्या उपचारासाठी लागणारे औषध जवळपास ६ लाख ते २० लाख रुपयांत मिळत असे. हे औषध आता १ लाख ते ५ लाख रुपयांमध्ये मिळेल.

३. दुर्धर आजारांवरील औषधांची नावे

या ४ आजारांवरील भारताने विकसित केलेल्या औषधांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

अ. Nitisinone (नायटीसिनोन)

आ. Eliglusat (एलिग्लुस्टॅट) (याचे मूल्य ३ कोटी रुपयांवरून अडीच लाख रुपयांना)

इ. Trientine (ट्रिएनटीन) (याचे मूल्य २ कोटी २ लाख रुपयांवरून २ लाख २ सहस्र रुपयांवर)

ई. Cannabidiol (कॅनाबिडायॉल) (याचे मूल्य ७ लाख ते ३४ लाख रुपयांवरून आता १ लाख ते ५ लाख रुपये आहे.)

येत्या काही मासांमध्ये आणखी ४ औषधे, म्हणजे ८ आजारांवर सिद्ध करून ती बाजारात स्वस्तात उपलब्ध करून दिली जातील.

देशाच्या स्वातंत्र्याला ७ दशके ओलांडून गेली, तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषधे निर्मिती करू न देणार्‍या आणि अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणार्‍या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

– वेद कुमार (साभार : फेसबुक)