आनंदी, प्रेमळ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाट्ये (रत्नागिरी) येथील (कै.) दशरथ एकनाथ भाटकर !

‘दशरथ एकनाथ भाटकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने १५.१०.२०२३ या दिवशी निधन झाले. आज १३ डिसेंबर या दिवशी त्यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या भावजयीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. ‘आमचे भाई (दशरथ भाटकर) नेहमी आनंदी आणि समाधानी होते.

२. प्रेमभाव

अ. भावा- भावांमध्येही सलोख्याचे संबंध होते. घरात कधीही भांडण झाले नाही.

आ. माझे लग्न होऊन मला या घरी येऊन ४५ वर्षे झाली. भाईंनी मला मुलीसारखे जपले. इतक्या वर्षांत ते माझ्याशी किंवा घरातील अन्य व्यक्तींशी उच्च स्वरात बोलले नाहीत. ते आमची माऊली होते.

इ. ते गावातील सर्वांशी प्रेमाने वागत.

३. सामाजिक दायित्व निभावणे

भाई पूर्वी गावातील श्री रवळनाथ लक्ष्मीकांत मंदिराचे खजिनदार होते. त्यांनी ते दायित्व प्रामाणिकपणे निभावले.

४. दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव

ते १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक होते. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’बद्दल  नितांत आदर होता. ते संपूर्ण दैनिक वाचत असत. नंतर वृद्धापकाळात ते घरातील व्यक्तींकडून दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून घेत असत. ‘माझ्या मृत्यूनंतरही ‘सनातन प्रभात’ नियमित चालू ठेवा’, असे ते नेहमी सांगत असत. त्यांच्या मृत्यूपूर्वी ४ दिवस आधी त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सनातन प्रभात चालू ठेवा.’’

५. सनातनच्या साधकांप्रती भाव

अ. भाईंनी आम्हाला सांगितले होते, ‘‘सनातनचे साधक घरी आल्यास त्यांना कधी विन्मुख पाठवू नका.’’

आ. भाई आम्हाला नेहमी सांगत, ‘‘सनातनचे करंबेळकरकाका (श्री. हनुमंत करंबेळकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७२ वर्षे) म्हणजे आपल्याला देव माणूस भेटला आहे. काका आमच्याकडे आले आणि आमच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात चालू झाले. त्यानंतर आमच्या घरातील सर्व अडचणी सुटल्या. माझ्या मुलाचे जीवनही सुखी झाले. आता आम्ही सर्व आनंदी आणि समाधानी आहोत.’’

– सौ. विजयश्री गंगाधर भाटकर (कै. दशरथ भाटकर यांची भावजय), भाट्ये, रत्नागिरी. (९.११.२०२३)