नेपाळ सीमेवरील अनधिकृत १०८ मदरशांना आखाती देशांकडून मिळाले १५० कोटी रुपये !

पैशांच्या वापराविषयी शोध चालू !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारत-नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत  मदरसे असल्याची माहिती याआधी समोर आली होती. यानंतर उत्तरप्रदेश सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक मोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने केलेल्या या अन्वेषणातून समोर आले की, या भागातील १०८ अनधिकृत मदरशांना आखाती देशांतून १५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या मदरशांकडून त्यांच्या बँक खात्यांची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. अन्वेषण पथक यासंदर्भातील पुढील अन्वेषण करत आहे.

अन्वेषण पथकाच्या एकूण व्याप्तीमध्ये एकूण २५ सहस्र मदरसे आहेत. पहिल्या टप्प्याच्या अन्वेषणात मान्यता नसलेल्या मदरशांचे अन्वेषण केले जात आहे. नेपाळ सीमेखेरीज देवबंद आणि अन्य काही क्षेत्रांमधील मदरशांचे अन्वेषणही केले जात आहे.  पोलिसांचे लक्ष विदेशी पैशांसह राजधानी देहलीतील एका अशासकीय संस्थेकडेही आहे. या संस्थेकडून गेल्या ३ वर्षांत मदरशांना २० कोटी रुपये मिळाले आहेत. या संस्थेला हे पैसे कुठून आले ? आणि या पैशांतून मदरसे कोणत्या स्वरूपाचे काम करत आहेत ?, यांचा शोधही घेतला जात आहे.

शिक्षणाच्या नावाखाली विदेशातून मिळालेल्या पैशांतून देशविरोधी कृत्य केली जात असावीत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये ‘ऑपइंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाने भारत-नेपाळ सीमेवर प्रत्यक्ष अन्वेषण करून अनधिकृत मदरशांचे स्वरूप उघड केल्यानंतर उत्तरप्रदेश शासनाने यासंदर्भात अन्वेषण आरंभिला होते. त्या वेळी नेपाळमधील काही खासदारांनीही उभय देशांच्या सीमाक्षेत्रात अनधिकृत कृत्ये केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

संपादकीय भूमिका

  • मदरसे हे आतंकवाद प्रसृत करणारे अड्डे असल्याचे याआधी अनेक वेळा समोर आले आहे. त्यात हे मदरसे अनधिकृत असल्याने त्यांच्यावर बंदी आणून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार भारतातील जिहादाचे मूळ हे तेथील मदरशांत असून त्यांवर कायमस्वरूपी बंदीच आणली पाहिजे. उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने या दृष्टीने कारवाई करून सर्वच राज्यांसमोर आता या दृष्टीनेही आदर्श प्रस्थापित केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !