अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थान येथील मारहाणप्रकरणी धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

राष्ट्रीय वारकरी परिषदेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे निवेदनाद्वारे मागणी !

डावीकडून ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने, देवेंद्र फडणवीस, आचार्य तुषार भोसले, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, भाजपचे खासदार श्री जयसिद्धेश्वर स्वामी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील गुहा गावातील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये मुसलमानांकडून वारकर्‍यांवर आक्रमण करण्यात आले होते. त्याविषयी, तसेच हिंदू आणि वारकरी यांना येणार्‍या समस्यांविषयी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ नोव्हेंबर या दिवशी पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर अन् भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, तसेच संतवीर बंड्या तात्या कराडकर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. मौजे गुहा येथील श्री कानिफनाथ मंदिरात १३ नोव्हेंबर या दिवशी आमचे वारकरी भजन करत असतांना काही मुसलमान समाजकंटकांनी भजन करत असलेले आमच्या वारकरी बांधव आणि भगिनी यांना धक्काबुक्की करत वारकर्‍यांचा अमूल्य ठेवा असलेले टाळ, मृदुंग यांची तोडफोड केली. श्री पांडुरंग परमात्म्याच्या कपाळी असलेल्या पवित्र बुक्याची विटंबना करून महिला वारकर्‍यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच हिंदु पुजारी आणि वारकरी यांना पुष्कळ मारहाण केली. याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय नाराज झालेला असून त्या संदर्भात वारकरी निषेध करत आहेत.

२. २१ नोव्हेंबर या दिवशी राहुरी तहसील येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेच्या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास येते, तसेच हे मुसलमान बायका-मुलांसहित वारकर्‍यांना मारहाण करण्यास आले होते, याचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र बघायला मिळत आहे. भजनाच्या ठिकाणी पावित्र्य भंग करण्यासाठी धूम्रपान करत, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.

३. श्री कानिफनाथ महाराज मंदिराची जागा वक्फ बोर्डद्वारे बळकावण्याचा प्रयत्न हे धर्मांध करत आहेत. काँग्रेसने केलेला हा वक्फ बोर्डाचा कायदा रहित करण्यात यावा. याद्वारे या मुसलमानांनी अनेक गड, दुर्ग, धार्मिक स्थळे येथे अतिक्रमणे केली आहेत. असा कायदा रहित करून हिंदूंच्या जागा, गडदुर्ग इत्यादी हिंदूंना मिळाव्यात. काँग्रेस सरकार मुसलमानांच्या हितासाठी आणि हिंदूंना नष्ट करण्याकरताच असा कायदा करते. त्याप्रमाणे भाजप सरकारनेही हिंदुहिताचा कायदा करून हिंदु आणि वारकरी यांना न्याय द्यावा.

वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या समस्येविषयी करण्यात आलेल्या मागण्या !

१. राहुरी येथील श्री कानिफनाथ मंदिरात वारकर्‍यांना मारहाण करणार्‍या मुसलमानांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी.

२. काँग्रेसने केलेला वक्फबोर्ड हा कायदा रहित करून त्याद्वारे हिंदूंच्या बळकावलेल्या जागा, धार्मिक स्थळे, गड, दुर्ग, इत्यादी त्वरित हिंदूंच्या कह्यात मिळावेत.

३. समान नागरी कायदा देशभर लागू करावा.

४. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कायदा करावा.

५. हिंदु देवता, संत, महंत, ग्रंथ, गोमाता, राष्ट्रपुरुष आणि माता-भगिनींच्या हत्या, विटंबना आणि धर्मांतर इत्यादी सातत्याने होत असल्याने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे.

६. श्री संत नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत भागवत धर्माचा प्रसार, प्रचार करून हिंदु आणि शीख धर्मात सलोख्याचे संबंध केले. यास्तव महाराष्ट्र संतभूमी असल्याने संत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येलाही नियंत्रण बसेल.

७. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धन जमा करणार्‍या संघटनेचे आर्थिक व्यवहार आणि आतंकवादी कारवायांसाठी केले जाणारे न्यायालयीन साहाय्य यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी.

८. प्रदक्षिणा मार्गावर वारकरी अनवाणी चालत दर्शन घेत असल्याने हा मार्ग खड्डे मुक्त करावा.

९. समान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी, धर्मांतरबंदी, जनसंख्या नियंत्रण कायदा हे त्वरित लागू करावेत किंवा हिंदु राष्ट्र त्वरित घोषित करावे.

१०. पंढरपूर येथे वारकर्‍यांच्या सोयीसाठी असलेले ‘कर्नाटक भवन’ खुले करून द्यावे.

११. पंढरपुरामध्ये जगभरातील भक्त येऊन आराधना करण्यास कायमस्वरूपी येऊन रहात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने येथे अद्ययावत् वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात.

१२. ‘चंद्रभागे स्नान ! तुका मागे हेचि दान !!’ या संत वचनाप्रमाणे प्रत्येक भाविक चंद्रभागा, इंद्रायणी या नद्यांमध्ये स्नान करून मगच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतो, याकरता या नद्यांमधील पाणी स्वच्छ, आरोग्यदायी असावे. यामध्ये गटारांचे सांडपाणी सोडू नये.