Lahore Pollution India : लाहोरमध्ये भारतामुळे प्रदूषण वाढल्याचा पाकिस्तानचा कांगावा !

आंतरराष्ट्रीय वायू तपासणी मंडळाने पाकला खोटे ठरवले !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या पंजाबमध्ये शेतातील तण जाळले जात असल्याने लाहोरमध्ये प्रदूषण वाढल्याचा कांगावा पाकने केला आहे; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच पाकला हात चोळत बसण्यापलीकडे काही करता येत नसल्याचे दिसत आहे.

१. भारतातील पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांत दिवाळीच्या आधी शेतातील तण जाळण्यात येत असल्याने नवी देहलीसह या राज्यांत प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होते.

२. यंदा पाकिस्तानच्या लाहोरमध्येही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. यासाठी भारताला उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत भारतातील पंजाबमध्ये तण जाळले जात असल्याने लाहोरमध्ये प्रदूषण वाढल्याचे सांगण्यात आले. हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्यावरही चर्चा झाली.

३. प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय वायू तपासणी मंडळाने भारतात जाळण्यात येणार्‍या तणांचा आणि लाहोरमधील प्रदूषणाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. प्रदूषण हे स्थानिक समस्यांमुळे होते. यासह पंजाबमधून लाहोरच्या दिशेने हवा वहात नसल्याने याचा काहीही संबंध नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानने उद्या त्याच्या दिवाळखोर होण्यासाठीही भारताला उत्तरदायी ठरवले, तर आश्‍चर्य वाटू नये !