(म्हणे) ‘भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांसाठी भारत सरकार जगणे कठीण बनवत आहे !’-जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भारतावर टीका !

ओटावा (कॅनडा) – भारत सरकारने कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्‍यांवर केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशांतील लाखो लोकांचे जीवन संकटात सापडले आहे. भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांसाठी भारत सरकार नेहमीप्रमाणे जगणे कठीण बनवत आहे, तसेच ते मुत्सद्देगिरीच्या मूलभूत तत्त्वांचेही उल्लंघन ठरत आहे, अशा शब्दांत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर टीका केली. भारताने कॅनडाच्या ६२ पैकी ४१ अधिकार्‍यांना देशातून जाण्यास सांगितल्यावर आणि कॅनडाने त्यांना माघारी बोलावल्यानंतर ट्रुडो यांनी ही टीका केली.

ट्रुडो पुढे म्हणाले की, कॅनडाच्या काही राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्याने प्रवास आणि व्यापार यांत अडथळा निर्माण होऊ शकतो. ‘कॅनडामध्ये शिकणार्‍या भारतियांसाठीही अडचणी निर्माण होतील’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. कॅनडामध्ये ५ टक्के भारतीय असून त्यात सर्वाधिक विद्यार्थी आहेत.

संपादकीय भूमिका

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! ट्रुडो यांनी स्वतः खलिस्तान्यांना पाठीशी घातल्यामुळे कॅनडातील भारतियांचे जगणे कठीण झाले आहे, त्याविषयी ते काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !