सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे

मुंबई – गणपति असो, दहीहंडी असो, नवरात्रोत्सव, रामजन्माचा उत्सव असो की हिदूंच्या अन्य देवतांचे उत्सव असोत, ते या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत; परंतु सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे, अशी भावना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’ करून व्यक्त केली आहे.

या ‘ट्वीट’मध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, उत्सव आनंदाने साजरा व्हायलाच पाहिजे. पारंपरिक ढोलताशा पथके, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक काढली, तर त्याचे पावित्र्य टिकेल. आनंद द्विगुणित होईल. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि अन्य धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचे अशी एक जमात आपल्याकडे आहे, त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कुणी शिकवू शकत नाही; परंतु मिरवणुकांच्या वेळेस ‘डी.जे.’, ‘डॉल्बी’ यांच्या आवाजाच्या कर्कश पातळीमुळे हृदय बंद पडणे, मृत्यू येणे, तात्कालीक किंवा कायमचे बहिरेपण येणे, मिरवणुकीच्या वेळी ‘लेझर लाईट’मुळे अनेकांची दृष्टी जाणे हे प्रकार वाढले आहेत. आपल्या आनंदाची मोजावी लागणारी ही किंमत मोठी नाही का ? कुठेतरी आपले चुकत आहे, याचा विचार करायला लावणारी आहे. सर्व राजकीय नेते, सरकारे, समाजातील विचारवंत आणि अर्थात गणेशोत्सव मंडळे यांनी पुढाकार घेऊन उत्सवांचे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच; परंतु सरकार आणि राजकीय पक्ष यांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर विचार आणि कृती करायला हवी.’’

… तर होर्डींग्ज उतरवण्यात माझा पक्ष पहिला असेल !

‘होर्डींग्ज’मुळे शहर विद्रूप होत आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे. ‘होर्डींग्ज’ संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील, तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. हिंदूंच्या सणांसाठी आम्हीच संघर्ष करतो आणि ते साजरे करतांना जर काही चुकीचे आढळले, तर आम्ही पुढाकार घेऊ, हा माझा शब्द आहे. आता विचार सगळ्या राजकीय पक्षांनी आणि अर्थातच समाजाचे नेतृत्व किंवा प्रबोधन करण्याची क्षमता असणाऱ्यांनी करायचा आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.