हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

मुंबई येथे ‘मंदिर संस्कृती रक्षण’ सभेला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती !

मुंबई, ३० सप्टेंबर (वार्ता.) – हिंदू हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी सरकारवर अवलंबून रहात आहेत; परंतु एक समाज असा आहे, जो आपले म्हणणे सरकारच्या गळी उतरवतो. सत्तेत हिंदू असूनही या लोकांच्या विचाराने सरकार चालते. आपला देश कुणी आतंकवादी चालवत नाहीत, तरीही हिंदुविरोधी भूमिका का घेतली जाते ? मंदिरांचे सरकारीकरण कुणी केले आहे ? सरकार मशिदी कह्यात का घेत नाहीत ? हिंदुत्वाच्या हितासाठी हिंदूंनी स्वत: कार्य करणे आवश्यक आहे. ज्या वेळी सनातन हिंदु समाज सार्वजनिक शक्ती दाखवून देईल, तेव्हा सत्ता हिंदूंपुढे नतमस्तक होईल, असे वक्तव्य सुप्रसिद्ध वक्ते आणि वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.

सुप्रसिद्ध वक्ते आणि वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ मार्गदर्शन करताना

गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ३० सप्टेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ‘मंदिर-संस्कृती रक्षण’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे, सचिव श्री. शशांक गुळगुळे, मुंबई येथील प्रख्यात शल्य चिकित्सक आणि ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थढानी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मनसेचे नेते श्री. नितीन सरदेसाई, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. श्री. गुळगुळे यांनी गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांनी ‘बाणगंगा तीर्थ आणि कॉरिडॉर प्रोजेक्ट’ याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.

असा झाला कार्यक्रमाला प्रारंभ !

डावीकडून श्री. शशांक गुळगुळे, श्री. प्रवीण कानविंदे, दीपप्रज्वलन करताना श्री. नितीन सरदेसाई, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, डॉ. अमित थढानी, श्री. सुनील घनवट आणि श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मप्रेमी श्री. विवेक सावंत यांनी शंखनाद केला. यानंतर श्री गणेशाचा श्लोक म्हणण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. यानंतर वेदमूर्ती श्रेयस लवाटेगुरुजी, नागेश साठेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी ब्रह्मवृंदांचा सन्मान केला. यानंतर व्यासपिठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मंदिरे सरकारमुक्त होण्यासाठी हिंदूंनी व्यापक लढा उभारावा ! – सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी होत असली, तरी अद्याप काशी, मथुरा येथील मंदिरे इस्लामी आक्रमणापासून मुक्त झालेली नाहीत. यांसह देशभरात ४ लक्ष ५० सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. चर्च, मशिदी यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण कशासाठी ? हिंदूंनी या विरोधात व्यापक लढा उभारायला हवा. मंदिरे ही सनातन धर्माची प्रचारकेंद्रे आहेत, हे हिंदूंनी समजून घ्यावे. मंदिरांतील पावित्र्याचा लाभ व्हावा, यासाठी मंदिरांमध्ये तोकडे कपडे परिधान करून येणार्‍यांचे विश्वस्तांनी प्रबोधन करावे. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करावी.

मंदिर-संस्कृति रक्षा सभेत उपस्थित मान्यवर आणि हिंदू

शासकीय योजनांत अपयशी ठरलेली सरकारे मंदिरांच्या सुव्यवस्थापनेची निश्चिती कोणत्या धर्तीवर देतात ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे हिंदु विधीज्ञ परिषदेकडून उघड करण्यात आले आहेत. कोल्हापूर येथील ३ सहस्रांहून अधिक मंदिरांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे गुन्हे अन्वेषण शाखेकडून अन्वेषण चालू आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचा अहवाल सरकार दाबून टाकत आहे. या विरोधात आमचा लढा चालू आहे. त्यामुळे मंदिराच्या सरकारीकरणाच्या विरोधात लढायचे असेल, तर ‘हा लढा प्रशासनाच्या भ्रष्ट मानसिकतेच्या विरोधातील लढा आहे’, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सरकार राबवत असलेली बहुतांश महामंडळे तोट्यात आहेत. अनेक उपक्रमांमध्ये सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातीलच शासकीय खात्यांमध्ये एका वर्षात चोर्‍यांमुळे ८ सहस्र कोटी रुपये इतकी हानी होते. सार्वजनिक उपक्रमांमध्ये १०० रुपये गुंतवल्यास त्यातील ५ पैसे सरकारला मिळतात आणि त्यावर ७ रुपयांहून अधिक व्याज द्यावे लागते. अशी सरकारे कोणत्या धर्तीवर मंदिर व्यवस्थापन चांगले करू, अशी निश्चिती देतात ?

गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संयुक्त प्रसिद्धीपत्रक –

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाच्या ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन !

डॉ. अमित थढानी लिखित ‘डॉ. दाभोळकर-पानसरे हत्या तपासातील रहस्ये ?’ या मराठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन (छायाचित्रात डावीकडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. शशांक गुळगुळे, श्री. प्रवीण कानविंदे, श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, श्री. नितीन सरदेसाई, डॉ. अमित थढानी आणि श्री. सुनील घनवट)

नास्तिकतावाद्यांच्या हत्यांचे भरकटलेले अन्वेषण आणि यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना फसवण्याचे षड्यंत्र याविषयीचे सत्य उघड करणार्‍या डॉ. अमित थढानी लिखित ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाच्या ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये’ या मराठी आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ – नास्तिकतावाद्यांच्या हत्यांमागील सत्य उघड करणारे पुस्तक !

या पुस्तकामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या अन्वेषणातील अनेक अज्ञात तथ्ये उघड केली आहेत. न्यायदानाचा अभाव आणि अन्वेषण यंत्रणांचे संपूर्ण अपयश हे या अन्वेषणात दिसून येते. या हत्यांच्या अन्वेषणात यंत्रणांवर राजकीय, तसेच बळाचा वापर जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे हे पुस्तक निर्देशित करते. अन्वेषण यंत्रणांनी राजकीय प्रभावाखाली काम करून या हत्यांचे अन्वेषण कशा प्रकारे भरकटवले ? याविषयी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे.

हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे हे षड्यंत्र हिंदूंनी गांभीर्याने घ्यावे ! – डॉ. अमित थढानी

आतापर्यंत या हत्यांमध्ये ६ आरोपींना पालटण्यात आले. या अन्वेषणातील तथ्येही वेगवेगळी आहेत. ही तथ्ये वेगवेगळी असूनही प्रसिद्धीमाध्यमे त्यांना प्रसिद्धी देत आहेत. आतापर्यंत हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे सापडली, हत्यारे पडताळण्यासाठी ‘स्कॉटलंड’ येथे पाठवण्यात आली. अशा प्रकारे विविध बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र ही हत्यारे स्कॉटलंडला पाठवण्यात आली नसल्याचे उघड झाले. हत्यारे स्कॉटलंडला पाठवण्याविषयीचा करारच झालेला नाही. या प्रकरणात ज्या आरोपींची रेखाचित्रे काढण्यात आली, तीही पालटण्यात आली. यातून या हत्यांचे अन्वेषण कोणत्या खोट्या पातळीला चालू आहे ? याची कल्पना येईल. हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्यासाठी वर्ष २००९ मध्ये ज्या प्रकारे ‘हिंदु आतंकवादा’चा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचाच हा पुढचा भाग आहे. हे अन्वेषण म्हणजे ‘मालेगाव भाग २’ आहे. त्यामुळे हिंदूंनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवे. ‘हिंदुत्वाला विरोध करणार्‍यांना संपवले जाते ?’ असा विचार जाणीवपूर्वक या हत्यांच्या अन्वेषणातून समाजात पसरवण्यात आला.