(म्हणे) श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ (विष) आहे ! – प्रा. चंद्रशेखर, शिक्षणमंत्री, बिहार

बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांचे संतापजनक विधान !

(पोटॅशियम सायनाईड एक प्रकारचे विष आहे. ते जीभेवर ठेवताच मनुष्याचा मृत्यू होतो)

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी श्रीरामचरितमानस या ग्रंथांची तुलना ‘पोटॅशियम सायनाईड’ या विषाशी केली आहे. ते ‘हिंदी दिवसा’निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. चंद्रशेखर यांनी पूर्वीही श्रीरामचरितमानसवर टीका केली होती, तसेच एका कार्यक्रमात महंमद पैगंबर यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हटले होते.
प्रा. चंद्रशेखर यांनी म्हटले की, श्रीरामचरितमानसमध्ये ‘पोटॅशियम सायनाईड’ असून जोपर्यंत श्रीरामचरितमानस असेल, तोपर्यंत त्यास मी विरोध करत राहीन. जर तुम्ही ५५ प्रकारची पक्वाने वाढाल आणि त्यात थोडेसे ‘पोटॅशियम सायनाईड’ टाकाल, तर तुम्ही ते खाऊ शकाल का ? माझ्या या विधानावरून माझी जीभ कापण्यासाठी १० कोटी रुपयांचे बक्षिस घोषित केले जाईल. जर माझी जीभ कोट्यवधी रुपयांची असेल, तर गळा किती कोटी रुपयांचा असेल ?

प्रा. चंद्रशेखर यांना समस्या आहे, तर त्यांनी धर्मांतर करावे ! – भाजप

भाजपचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी प्रा. चंद्रशेखर यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, प्रा. चंद्रशेखर हे श्रीरामचरितमानसवर सातत्याने गरळओक करत आहेत. हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ऐकू येत नाही का ? नितीश कुमार सातत्याने सनातन धर्माचा अवमान करत आहेत. त्यांच्या मंत्र्याला सनातन धर्माविषयी समस्या आहे, तर त्यांनी धर्मांतर करून घ्यावे.

जनता दल (संयुक्त) पक्षाची प्रा. चंद्रशेखर यांच्या विधानापासून फारकत !

सत्ताधारी जनता दल (संयुक्त)ने त्यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार प्रा. चंद्रशेखर यांच्या श्रीरामचरितमानसविषयीच्या विधानापासून फारकत घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी म्हटले की, ज्यांना श्रीरामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाईड दिसते यांनी त्यांची विचारसरणी स्वतःपर्यंतच ठेवावी, ती पक्ष किंवा ‘इंडिया’ आघाडीवर थोपण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सर्व धर्म आणि धार्मिक ग्रंथ यांचा मान राखतो. काही लोक प्रसारमाध्यमांमध्ये चमकण्यासाठी अशा प्रकारची विधाने करत असतात.

संपादकीय भूमिका 

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांचा असा अवमान करण्याचे धाडस प्रा. चंद्रशेखर करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय हातील ?, हे त्यांना ठाऊक आहे !