जळगाव येथे राणी लक्ष्मीबाई यांना बलीदान दिनानिमित्त मानवंदना !

  • हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेचा उपक्रम !

  • महापौरांच्या उपस्थितीत विशेष उपक्रमाचे आयोजन !

राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करतांना  महापौर सौ. जयश्री महाजन आणि रणरागिणी

जळगाव – झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदान दिनानिमित्ताने शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील स्मारकाजवळ हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. या वेळी जळगावनगरीच्या महापौर सौ. जयश्री महाजन, भाजपच्या माजी महापौर सौ. सीमा भोळे, शिवसेनेच्या शोभा चौधरी, ‘सखी मंचा’च्या सौ. रेखा कुलकर्णी, माजी प्राध्यापिका सौ. प्रज्ञा जंगले, रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील, कु. भावना पाटील, कु. ईश्वरी उगले यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते. या वेळी रणरागिणी सायली पाटील यांनी लाठीची प्रात्यक्षिके करून राणीला मानवंदना दिली. तसेच रणरागिणी शाखेकडून महापौर महाजन यांना स्मारकाच्या संवर्धनाच्या संदर्भात दिलेल्या निवेदनावर तत्परतेने कार्यवाही करून स्मारकाचे जतन आणि संवर्धनाचे काम केल्याविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्वश्री गजू तांबट, सागर महाजन, बाळू चौधरी, अनिल चौधरी, मोहन तिवारी, धनंजय चौधरी यांनी सहकार्य केले.

हिंदु जनजागृती समितीचा स्वसंरक्षण प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम !

प्रत्येक महिला आणि मुलगी यांना स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. यासाठी हिंदु जनजागृती समिती देत असलेला प्रशिक्षणाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. झाशीच्या राणीचे बलीदान आपल्याला प्रेरणा देते. खोट्या प्रेमाला मुलींनी बळी पडू नये, माता आणि पिता यांचे प्रेम हे खरे प्रेम आहे. युवतींनी आधी स्वकर्तृत्वाने स्वतःच्या पायांवर उभे राहिले पाहिजे. ‘मला दिलेल्या निवेदनानुसार स्मारकाच्या दुरुस्तीविषयीचे काम चालू केले असून लवकरच उरलेली कामेही पूर्ण होतील’, असे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले.

रणरागिणीच्या कु. सायली पाटील यांनी युवतींना झाशीच्या राणीचा आदर्श घेण्यास सांगितले. सौ. प्रज्ञा जंगले म्हणाल्या की, मुलींना शाळा-महाविद्यालयात जाऊन हिंदु धर्माचे  शिक्षण देऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

समितीच्या निवेदनाचा परिणाम ! : स्मारकाच्या ठिकाणी पालट केले !

शहरातील राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाची स्थिती दयनीय झालेली होती. त्याची आवश्यक ती डागडुजी करावी, याविषयी समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने १६ मे या दिवशी महापौर सौ. जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून बलीदानदिनाच्या दिवशी स्मारकाच्या ठिकाणी निवेदनात सांगितल्यानुसार पालट करण्यात आले.