छत्रपती संभाजीनगर येथे उत्तरपत्रिकांत हस्ताक्षरांत पालट !

५५२ विद्यार्थ्यांना मंडळाने बजावल्या नोटिसा; लवकरच चौकशी अहवाल !

प्रतीकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी इयत्तेच्या परीक्षांचे निकाल तोंडावर असतांना उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर पालट आणि कथित अपप्रकारांवर मंडळाच्या येथील कार्यालयात सुनावणी चालू झाली आहे. पहिल्याच दिवशी ८७ प्रकरणांत चौकशी समितीने विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. यात विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांत अगदी मोजक्या प्रश्नांची जी उत्तरे लिहिली आहेत, ती इतर कुणीतरी नंतर लिहिली असल्याचा दावा केला. मंडळाने एकूण ५५२ विद्यार्थ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

हस्ताक्षर पालट असलेली ही प्रश्नांची उत्तरे एका ओळीत, तर काही उत्तरपत्रिकांत फार तर ३ ओळींत लिहिली आहेत. या प्रकारामुळे आता निकाल राखून ठेवला जाणार का ? किंवा आपण लिहिलेल्या योग्य उत्तरांच्या गुणांवर परिणाम होणार का ? या विचाराने विद्यार्थी आणि पालक प्रचंड धास्तावले आहेत. विशेषत: भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकांत हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला आहे. पहिल्या दिवशी ५५ हून अधिक विद्यार्थी एकट्या अंबाजोगाई परिसरातील होते. या चौकशीनंतर ‘या पान क्रमांकावर माझे हस्ताक्षर नाही’, असे विद्यार्थ्यांकडून पालकांच्या साक्षीने लिहून घेण्यात आले.

पेपर पडताळतांना शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मंडळाने चौकशीसाठी बोलावले आहे. विद्यार्थी स्पष्ट नाकारत आहेत. त्यामुळे हा पालट कुणी केला, असा प्रश्न विद्यार्थी आणि मंडळ यांनाही पडला आहे. या मुलांचे निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. मंडळाने या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जाईल, असे म्हटले आहे. – अनिल साबळे, अध्यक्ष, मंडळ

संपादकीय भूमिका

शिक्षण मंडळाने या प्रकरणातील नेमका झालेला गौडबंगाल लवकरात लवकर उघडकीस आणून पालक आणि विद्यार्थी यांना दिलासा द्यावा !