राज्यातील १०० मंदिरांत भाविकांना न्याहारी देण्याची तमिळनाडू सरकारची योजना !

तामिळनाडूत भाजपचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी द्रमुकच्या हिंदूंसंदर्भातील भूमिकेत पालट !

प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यात भाजपचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी द्रमुक हा हिंदुविरोधी पक्ष सध्या हिंदूंना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या सरकारने प्रथमच राज्यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना न्याहारी देण्याची व्यवस्था केली आहे. या मंदिरांत राज्यातील या १०० मंदिरांत प्रतिदिन एकूण दीड लाखांपेक्षा अधिक भाविक येतात. यांमध्ये कांचीपुरम् येथील कामाक्षी मंदिर आणि मदुराई येथील मीनाक्षी मंदिर यांचाही समावेश आहे. सरकारने मंदिरांकडून चालवण्यात येणार्‍या अनुमाने ३ सहस्र शाळांमध्ये मध्यान्ह भोजनही चालू केले आहे.

१. याखेरीज सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील ४४ सहस्र मंदिरांच्या ४ सहस्र ५०० एकर भूमीवरील अतिक्रमण काढले आहे. या भूमीचे मूल्य ४ सहस्र २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (याआधीही राज्यात द्रमुकचे सरकार असतांना त्याने हे तेव्हा का केले नाही ? यातून यांना केवळ स्वत:चा राजकीय स्वार्थ साधायचा आहे, हेच लक्षात येते ! – संपादक)

२. १ सहस्र वर्षे जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी ३४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही द्रमुक सरकारने केली आहे.

३. असे असले, तरी सरकारच्या आश्‍वासनानंतरही मंदिर कर्मचार्‍यांच्या वेतनात पुरेशी वाढ झाली नाही, असे कांचीपुरम् मंदिराचे मुख्य पुजारी नटराज शास्त्री यांनी सांगितले.

४. राजकीय विश्‍लेषक सुमंत रामण म्हणाले, ‘‘द्रमुक सरकार प्रथमच हिंदूंचे हित साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे. सातत्याने वाढत असलेला भाजपच्या मतांचा टक्का याचे मुख्य कारण आहे. अण्णाद्रमुक पक्षात अंतर्गत बंडाळ्या चालूच असतात. काँग्रेस येथे द्रमुकवर अवलंबून आहे. पंतप्रधान मोदी यांची राज्यातील लोकप्रियता हा भाजपचा सर्वांत मोठा आधार आहे.’’

भाजपचा अशा प्रकारे वाढत आहे जनाधार !

भाजपला वर्ष २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत २.६ टक्के मते मिळाली होती. विधानसभेत भाजपचे ४ आमदार आहेेत. या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये झालेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढून ५.४१ टक्के झाली. प्रथमच भाजपचे ३०८ उमेदवार विजयी झाले. शहरी स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकीत भाजपला १८ जागाच मिळाल्या होत्या. तेव्हा भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ३.४ होती.

संपादकीय भूमिका

मुळात द्रमुक हा हिंदुविरोधी पक्ष असून त्यास मत न देण्यातच तमिळनाडूतील हिंदूंचे हित आहे. अर्थात् गेल्या अनेक दशकांच्या तेथील द्रविड आंदोलनाचा वैचारिक पगडाही तेथील हिंदूंवर आहे. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण दिल्यानेच द्रमुकचा जनाधार अल्प होईल, हे लक्षात घ्या !