शाश्वत आनंदप्राप्तीसाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘सर्वोच्च आणि चिरंतन आनंद प्राप्त करणे’, या विषयावर ‘ऑनलाईन’ शोधनिबंध सादर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक !

श्री. शॉन क्लार्क

फोंडा (गोवा) – आपली सर्व दु:खे दूर व्हावीत आणि कायमस्वरूपी आनंद अनुभवता यावा, यासाठी आपली सर्व धडपड चालू असते; मात्र ‘आनंद कसा मिळवायचा ? आणि सतत आनंदी कसे रहायचे ?’, हा विषय कुठल्याही शाळा-महाविद्यालयांत शिकवला जात नाही. ईश्वराचा नामजप करण्यासारखी नियमित आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी सतत प्रयत्न केल्यास शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्या दूर होऊन आपल्याला शाश्वत सुखाची म्हणजेच आनंदाची प्राप्ती होते, असे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितले.

बँकॉक, थायलंड येथे ‘टूमॉरो पिपल ऑर्गनायजेशन’ने आयोजित केलेल्या ‘सुख आणि समृद्धी’ या विषयावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (आय.सी.एच्.डब्ल्यू. २०२३) ते बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘मानसिक-आध्यात्मिक माध्यमांतून चिरंतन आनंद प्राप्त करणे’, या विषयावरील शोधनिबंध या शैक्षणिक परिषदेत सादर केला. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

या वेळी श्री. क्लार्क यांनी सांगितले की,

१. बहुतांश लोकांच्या जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा ३ प्रकारच्या समस्या न्यूनाधिक प्रमाणात असतात.

२. यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक समस्या या निव्वळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होतात. कधी-कधी या आध्यात्मिक समस्यांचे परिणाम शारीरिक किंवा मानसिक त्रासांच्या स्वरूपातही प्रकट होतात. तसेच प्रारब्ध (नशीब), अतृप्त पूर्वजांमुळे होणारे त्रास आणि सूक्ष्म-जगतातील नकारात्मक ऊर्जा या ३ समस्यांची कारणेही केवळ आध्यात्मिक असतात. या सर्वांवर आध्यात्मिक साधना करणे हाच उत्तम उपाय आहे.

३. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्यांचेही निवारण होते. ही माहिती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या ४० वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनावर आधारलेली आहे.

४. शाश्वत आनंदप्राप्तीसाठी आपण श्रद्धापूर्वक ३ टप्प्यांतील उपायांचा अवलंब करू शकतो. प्रथम म्हणजे ईश्वराचा नामजप करणे. नामजपामुळे निर्माण झालेल्या सूक्ष्म सकारात्मक परिणामांविषयी ‘जीडीव्ही बायोवेल’ या वैज्ञानिक उपकरणाचा वापर करून प्रयोग करण्यात आले. या प्रयोगामध्ये ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप केवळ ४० मिनिटे केल्यानंतर कुंडलिनी चक्र एका रेषेत येऊन प्रचंड सकारात्मक ऊर्जा स्वत:कडे आकर्षित झाल्याचे दिसून आले.

५. दुसरे म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात.

६. तिसरा उपाय म्हणजे प्रतिदिन खडे मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसण्याचे उपाय केल्याने शरिरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास साहाय्य होते, असे आढळले.

७. प्रत्येकाने अध्यात्मशास्त्रानुसार ही साधना केली, तर कालांतराने ती व्यक्ती परमानंदाची किंवा आपल्यातील दैवी तत्त्वाची अनुभूती घेऊ शकते.