शेतकर्‍यांचा मोर्चा स्थगित ! – जे.पी. गावित, शेतकरी नेते

शेतकर्‍यांच्या ७० टक्के मागण्या मान्य !

शेतकरी नेते जे.पी. गावित

ठाणे – शेतकर्‍यांचा मोर्चा १८ मार्चला स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी दिली आहे. ‘महाराष्ट्र सरकारने आम्हाला शिष्टमंडळ घेऊन बोलावले आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. आमच्या ७० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. बाकीच्या मागण्या विचाराधीन आहेत. बैठकीतील प्रत ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी आमच्याकडे सुपुर्द केलेली आहे. मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकरी समाधानी आहेत. ज्या मागण्या विचाराधीन आहेत, त्या येत्या काही दिवसांत नक्कीच पूर्ण होतील’, असे गावित यांनी या वेळी सांगितले. ते येथील वासिंद (ठाणे) येथून बोलत होते. शेतकर्‍यांचा मोर्चा नाशिकहून वासिंद येथे पोचल्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.

‘शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, सातबारा उतारा कोरा केला पाहिजे, हानीनंतर शेतकर्‍यांना तातडीने पीकविमा मिळाला पाहिजे, अवेळी पडणार्‍या पावसामुळे होणार्‍या हानीचे तातडीने पंचनामे करून त्याची भरपाई दिली पाहिजे’, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकर्‍यांचा मोर्चा नाशिक येथून ठाणे येथे आला होता.