(म्हणे) ‘भारताच्या संसदेत विरोधी पक्षनेत्यांचे ध्वनीक्षेपक बंद केले जातात !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ब्रिटीश संसदेत भारतविरोधी गरळओक !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी ब्रिटीश संसदेत बोलताना

लंडन – भारताच्या संसतेद विरोधी पक्षनेत्यांचे ध्वनीक्षेपक (माईक) बंद केले जातात. त्यांना बोलूही दिले जात नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतविरोधी गरळओक केली. ते ब्रिटीश संसदेच्या ‘ग्रँड कमिटी रूम’मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी अनेक ब्रिटीश खासदार, प्राध्यापक, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गांधी पुढे म्हणाले की, नोटाबंदी हा भारतातील एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता; परंतु आम्हाला त्यावर चर्चा करण्याची अनुमती नाही. आम्हाला ‘वस्तू आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) या कायद्यावरही चर्चा करण्याची अनुमती नाही. इतकेच नव्हे, तर चिनी सैन्याने भारतीय सीमेत प्रवेश केल्याच्या सूत्राविषयीही आम्ही बोलू शकत नाही. त्यामुळे आम्हाला गुदमरल्यासारखे वाटते. भारताची लोकशाही ही अमेरिका आणि युरोप यांच्या तिप्पट आहे. त्यामुळे ही लोकशाही मोडून पडल्यास जगभरातील लोकशाहीला मोठा धक्का बसेल. राहुल गांधी यांनी अन्य ठिकाणी केलेल्या भाषणात भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही तो ‘फॅसिस्ट’ असल्याचा आरोप केला.

संपादकीय भूमिका

जगभरात भारताची प्रतिमा मलीन करणार्‍या अशा लोकांमध्ये ‘राष्ट्रभक्ती किती आहे ?’ हे स्पष्ट होते ! अशी मानसिकता असलेल्या लोकांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाने भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणे, हे भारतियांसाठी दुर्दैवी आहे !