गेल्या ११ मासांमध्ये पुणे रेल्वे विभागात विनातिकीट प्रवाशांकडून २२ कोटी रुपयांचा दंड वसूल !

पुणे – रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्याकरता रेल्वेकडून नेहमीच पडताळणी मोहीम राबवण्यात येत असते. पुणे रेल्वे  विभागामध्ये गेल्या ११ मासांमध्ये ३ लाखांहून अधिक प्रवाशांना विनामूल्य प्रवास करतांना पकडले आहे. (यावरून नागरिकांवर नियम पालनाचा संस्कार नाही, हेच लक्षात येते. जे प्रवासी नियमांचे पालन करत नसतील त्यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षाच द्यायला हवी ! – संपादक) त्यांच्याकडून २२ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती समजते.

फेब्रुवारीमध्ये तिकीट पडताळणीत २० सहस्र ५३७ प्रवासी विनातिकीट प्रवास करतांना आढळले. त्यांच्याकडून १ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, तसेच अनियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ६ सहस्र ८४३ इतकी असून त्यांच्याकडून ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.