विश्‍वविद्यालयांमध्ये विश्‍वाचे ज्ञान दिले जात नाही !  

  • ‘टाइम्स’ समूहाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जैन यांची स्पष्टोक्ती !

  • भारत आध्यात्मिक देश असल्याचेही केले स्पष्ट !

‘टाइम्स’ समूहाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जैन

नवी देहली – धर्म, अध्यात्म आणि देश यांना जोडले जाऊ शकते. आपण असे म्हणू नये की, हा धार्मिक देश आहे, तर हा आपला आध्यात्मिक देश आहे. तुम्ही शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये जे शिकणार आहात ते विज्ञान म्हणजे भौतिक, रसायन आणि जीव शास्त्र. या फार छोट्या गोष्टी आहेत. ‘युनिव्हर्सिटी’तील विद्यार्थ्यांनी ‘युनिव्हर्स’ हा फार मोठा शब्द स्वीकारला आहे; मात्र विश्‍वाचे ज्ञान विश्‍वविद्यालयामध्ये दिले जात नाही.

आध्यात्मिक शिक्षण, म्हणजे न दिसणार्‍या गोष्टी शिकणे. तथापि या गोष्टी शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवल्या जात नाहीत. तेथे केवळ नोकरी-व्यवसायासाठी शिकवले जाते, असे विधान ‘टाइम्स’ समूहाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जैन यांनी येथे केले. टाइम्स समूहाने आयोजित केलेल्या ७ व्या ‘टाइम्स लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये ते विद्यार्थ्यांसमोर बोलत होते.

आपल्याला न दिसणारे विज्ञान शिकावे लागेल !

समीर जैन म्हणाले की, आपल्याला न दिसणारे विज्ञान शिकावे लागेल, जसे की प्रेम, जे अदृश्य आहे. आकाशाचा अभ्यास जो शिव आणि शक्ती यांनी भरलेला आहे, जो कधीही पालटत नाही. पौराणिक कथा वाचल्या, तरी त्यात इतिहास भरलेला आहे. रामायण आणि महाभारत वाचून तुम्हाला केंद्रबिंदू मिळतो.

अध्यात्म स्वीकारून भारत जगाचा स्वामी होणार !

गुरु नानक यांच्या निर्गुण-सगुण भक्तीचा संदर्भ देत समीर जैन म्हणाले की, ‘निर्गुण आप सगुण भी सोही.’ निर्गुण आणि सगुण दोघेही तुम्हीच आहात. तुम्हीच साकार आणि निराकार आहात. अध्यात्म स्वीकारून भारत जगाचा स्वामी होणार आहे. विद्यार्थी त्याचा फार महत्त्वाचा भाग होतील.