(म्‍हणे) ‘…तर मी धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांच्‍या पायावर डोके ठेवून क्षमा मागीन !’ – शाम मानव

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांचे ढोंग

शाम मानव (डावीकडे ) आणि धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज

नागपूर – अखिल भारत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक शाम मानव यांनी बागेश्‍वर धामचे कथावाचक धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्री महाराजांना पुन्‍हा एकदा आव्‍हान दिले आहे. ‘महाराजांनी दिव्‍य शक्‍ती सिद्ध करण्‍याविषयीचे ३० लाख रुपयांच्‍या पारितोषिकांचे आव्‍हान दरबारात नाही, तर नागपूर येथील पत्रकार आणि पंचसमिती यांच्‍या समक्ष स्‍वीकारावे’, असे आव्‍हान दिले आहे, तसेच धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांनी त्‍यांचे दावे सिद्ध केले, तर मी त्‍यांच्‍या पायावर डोके ठेवून क्षमा मागीन, तसेच ४० वर्षांपासून काम करणारी आमची संस्‍था बंद करू, अशी विधाने २१ जानेवारी या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना शाम मानव यांनी केली आहेत. (पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांनी दिलेले आव्‍हान स्‍वीकारण्‍याचे धाडस शाम मानव करू शकत नाहीत. त्‍यामुळे ते पुन्‍हा पुन्‍हा अशी आव्‍हाने देत आहेत, असे हिंदूंना वाटते ! – संपादक)

शाम मानव म्‍हणाले की…

१. धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांच्‍या दाव्‍यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रितसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्‍हान दिले आहे. आम्‍ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्‍वरूपात हे आव्‍हान दिले आहे. या आव्‍हानाच्‍या अटी अत्‍यंत महत्त्वाच्‍या आहेत; कारण हे दावे करतांना माहिती गोळा करण्‍याची यंत्रणा वापरली जाते. तशाप्रकारे आम्‍ही अनेक बाबांच्‍या दाव्‍यांचा पर्दाफाश केला आहे.

२. आव्‍हान प्रक्रिया महाराजांच्‍या दरबारात पार पडणार नाही. कोणत्‍याही यंत्रणेच्‍या माध्‍यमातून दावा करणार्‍यांपर्यंत माहिती पोचू नये, याची काळजी घेऊन ही आव्‍हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते.

३. ही प्रक्रिया नागपूर येथील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्‍यासाठी एक तटस्‍थ पंचसमिती नेमली जाईल. यात निवृत्त न्‍यायाधिशांचाही समावेश असू शकेल. १० माणसांना पाहून महाराजांनी त्‍यांचे नाव, वय, वडिलांचे नाव आणि त्‍यांचा भ्रमणभाष क्रमांक सांगावा.

४. धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री दोन्‍ही वेळा ९० टक्‍के माहिती योग्‍य सांगू शकले, तर याचा अर्थ असा होतो की, त्‍यांच्‍यात दिव्‍य शक्‍ती आहे. त्‍यांना दिव्‍य शक्‍ती प्रसन्‍न आहे. त्‍यानंतर आम्‍ही त्‍यांना आमच्‍या समितीचे ३० लाख रुपयांचे पारिताषिक देऊ.

५. गेल्‍या ४० वर्षांपासून आम्‍ही हे पारितोषिक घोषित करत आहोत. आधी हे १ लाख रुपयांचे होते, ते आता ३० लाख रुपयांचे झाले आहे. (२ दिवसांपूर्वी रायपूर येथे चालू असलेल्‍या कथावाचनाच्‍या कार्यक्रमात धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांनी दिव्‍य शक्‍तीद्वारे ‘एबीपी’च्‍या हिंदी वृत्तवाहिनीचे पत्रकार ज्ञानेंद्र तिवारी यांच्‍यासह त्‍यांच्‍या नातेवाइकांची नावे सांगितली होती. हा दिव्‍य शक्‍तीचा चमत्‍कारच आहे. याविषयी शाम मानव का बोलत नाहीत ? – संपादक)

शाम मानव यांची साधूसंतांवरील टीका, हे काँग्रेसप्रणीत षड्‍यंत्र ! – आमदार राम कदम, भाजप

भाजपचे आमदार राम कदम

मुंबई – हिंदु धर्म आणि साधू-संत यांवर टीका करून शाम मानव हे राहुल गांधी यांच्‍या समवेत ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले, हा योगायोग आहे कि त्‍यांच्‍या तोंडून काँग्रेसची ‘स्‍क्रीप्‍ट’ बाहेर पडत होती ? काँग्रेसचा हिंदू आणि हिंदु धर्म यांना विरोध आहे. त्‍यामुळे द्वेषातून नियोजित षड्‍यंत्र करण्‍यात येत आहे. साधू-संतांवरील टीका हे काँग्रेसप्रणीत षड्‍यंत्र आहे, असे वक्‍तव्‍य भाजपचे आमदार राम कदम यांनी केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्‍थापक शाम मानव यांनी बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्‍य शक्‍ती यांना अंधश्रद्धा ठरवणारे ‘ट्‍वीट’ केले आहे. आमदार कदम यांनी शाम मानव यांना ट्‍वीटद्वारे उत्तर दिले आहे. यामध्‍ये आमदार राम कदम यांनी म्‍हटले आहे की, आम्‍ही कधी अंधश्रद्धेचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही; परंतु हिंदु धर्मातील ४ वेद, १८ पुराणे, उपनिषदे आदींमध्‍ये ग्रहण विज्ञान आहे. अष्‍टांगयोग, साधनेचे बळ हे साधकाला साधनेद्वारे प्राप्‍त होते; परंतु काँग्रेसी असल्‍यामुळे या गोष्‍टी तुमच्‍या गळ्‍याखाली उतरणार नाहीत.

संपादकीय भूमिका

  • पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराजांनी दिलेले आव्‍हान शाम मानव यांनी का स्‍वीकारले नाही ? याचे उत्तर त्‍यांनी प्रथम द्यावे !