कर्नाटकमधील भाजपचे आमदार जगदीश शेट्टर यांदा दावा कायदेशीर लढ्यासाठी गोवा कमकुवत !

म्हादई जलवाटप तंटा

पणजी, २१ जानेवारी (वार्ता.) – म्हादई जलवाटप तंट्याविषयी कायदेशीर लढा देण्यासाठी गोवा राज्य कमकुवत आहे, असा दावा भाजपचे कर्नाटकमधील आमदार तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादई जलतंटा लवादाने कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवण्याचा अधिकार दिला आहे. या प्रकरणी गोमंतकियांनी कितीही मोठा लढा दिला, तरीही त्यांना यश मिळणार नाही. कर्नाटकमध्ये म्हादईप्रश्नी भाजपने जे कार्य केले आहे, ते काँग्रेसने येथे सत्तेवर असतांना केले नाही. म्हादईप्रश्नी काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही.’’

समितीने प्रामाणिकपणे कार्य केल्यास गोव्याला न्याय मिळेल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

पणजी – गोवा विधानसभेने म्हादईप्रश्नी लढा देण्यासाठी गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या म्हादई सभागृह समितीने प्रामाणिकपणे कार्य केल्यास आम्ही म्हादईचा लढा जिंकू शकू, असे आश्वासक विधान पर्यावरणप्रेमी श्री. राजेंद्र केरकर यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकने कळसा-भंडुरा धरण प्रकल्पांच्या ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’त (‘डी.पी.आर्.) सुर्ला गावाचा उल्लेख करून मोठी चूक केली आहे. ही गोष्ट गोव्याने केंद्रशासन आणि केंद्रीय जल आयोग यांच्या नजरेस आणून देण्याचे मोठे दायित्व आहे. म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित केल्यास गोव्याची बाजू अधिक भक्कम होईल. म्हादई अभयारण्यातील घरे असलेला भाग वगळून अन्य क्षेत्र व्याघ्र क्षेत्र घोषित केल्यास त्याची स्थानिकांना अडचण होणार नाही. म्हादई सभागृह समिती गोव्याची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी साहाय्य करू शकते.’’

 ♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦