इंदूर (मध्यप्रदेश) येथील सिंधी मंदिरांतील ‘श्री गुरुग्रंथ साहिब’च्या प्रती गुरुद्वारामध्ये जमा !

निहंग शिखांनी मंदिरांत देवतांच्या मूर्तींसमवेत ‘श्री गुरुग्रंथ साहिब’ ठेवण्यावर घेतला होता आक्षेप !

(निहंग शीख म्हणजे निळ्या रंगाचे कपडे आणि मोठी पगडी घालणारे अन् शस्त्र बाळगणारे शीख)

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील सिंधी समाजाने त्यांच्या मंदिरांमध्ये अनेक दशकांपासून ठेवण्यात आलेले ८० हून अधिक ‘श्री गुरुग्रंथ साहिब’ ग्रंथ इमली साहिब या गुरुद्वारामध्ये जमा केले. निहंग शीख आणि सिंधी समाज यांच्यातील वादानंतर सिंधी समाजाकडून ग्रंथ जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

१. निहंग शिखांच्या एका गटाने ज्या सिंधी मंदिरांमध्ये श्री गुरुग्रंथ साहिब ठेवण्यात आले आहेत, तेथील सर्व मूर्ती हटवण्याची मागणी केली होती. सिंधी समाजाने हे अमान्य करत मंदिरांतील ‘श्री गुरुग्रंथ साहिब’च गुरुद्वारामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ते जमा केले.

२. अमृतसर येथील निहंग शिखांच्या एका गटाने इंदूरमधील अन्नपूर्णा मार्गावरील सिंधी समाजाच्या मंदिराचा दौरा केला. या मंदिरात श्री गुरुग्रंथ साहिब ठेवण्यात आले होते आणि त्याची पूजा केली जात होती. या गटाने जेथे देवतांच्या मूर्तींची पूजा केली जाते, तेथे श्री गुरुग्रंथ साहिब ठेवण्यावर आक्षेप घेतला. त्यांनी ग्रंथाचा अवमान होत असल्याचे सांगितले. तसेच या गटाने पोलीस ठाण्यातही याविषयी तक्रार प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला. या गटाचे म्हणणे होते की, जेथे श्री गुरुग्रंथ साहिबची पूजा होते, ते स्थान गुरुद्वारा बनते. यामुळे तेथे गुरुद्वाराच्या संदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या सिंधी मंदिरांमध्ये श्री गुरुग्रंथ साहिब ठेवण्यात आले, त्यांना ‘गुरुद्वारा’ घोषित केले पाहिजे, तसेच तेथून मूर्ती हटवल्या पाहिजेत. जर हे मान्य नसेल, तर मंदिरांमध्ये श्री गुरुग्रंथ साहिब ठेवण्यात येऊ नये. यासह या गटाने १२ जानेवारीपर्यंत ग्रंथ जमा करण्याचे आवाहन केले. त्या वेळी या गटाचा ‘हिंदु जागरण मंच’च्या संदस्यांशी वाद झाला.

३. यानंतर सिंधी समाजाने संतांसमवेत बैठक घेऊन ५ सदस्यीय समिती नेमली आणि या समितीने चर्चा करून गुरुद्वारामध्ये श्री गुरुग्रंथ साहिब जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ जानेवारी या दिवशी ते जमाही केले.

संपादकीय भूमिका

निहंग शिखांना इतकी दशके मंदिरांमध्ये मूर्तींसमेवत हा ग्रंथ ठेवल्याची माहिती नव्हती का ? कि शीख आणि हिंदु असा द्वेष निर्माण करण्याची त्यांची खलिस्तानी मानसिकता ते दाखवत आहेत ?, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे !