‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आजर्‍यात २५ सहस्र हिंदू रस्त्यावर !

हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी

मोर्च्यातील सहभागी हिंदू

आजरा (जिल्हा कोल्हापूर) – गेल्या काही दिवसांपासून आजरा परिसरात ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढत आहेत. याच समवेत हिंदु मुलींची छेडछाड, हिंदु युवकांना जाणीवपूर्वक त्रास देणे आदी असे प्रकारही वाढत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आजर्‍यात ६ जानेवारीला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. व्यंकटराव हायस्कूल येथून या मोर्च्याला प्रारंभ करण्यात आला. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन शिवतीर्थ येथे या मोर्च्याचा समारोप झाला. समारोपप्रसंगी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, हिंदु एकता आंदोलनाचे सातार्‍याचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव, तसेच हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्च्याला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, संप्रदाय यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्त यांचासह २५ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

‘लव्ह जिहाद’चे संकट प्रत्येक हिंदूच्या घरापर्यंत पोचले आहे ! – सौ. राजश्री तिवारी

हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी मार्गदर्शन करताना

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना सौ. राजश्री तिवारी म्हणाल्या, ‘‘गेल्या ३ वर्षांत हिंदु मुली आणि युवती यांचे गायब होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ‘लव्ह जिहाद’चे संकट आज प्रत्येक हिंदूच्या घरापर्यंत पोचले आहे. त्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायद्याची तरतूद आवश्यक आहे. हा कायदा करतांना हिंदु मुलींनी अन्य धर्मियांसमवेत विवाह केल्यास त्यांना आई-वडील यांच्या संपत्तीतील वाटा मिळू नये, तसेच हिंदु युवतीच्या आई-वडिलांच्या संमतीविना आंतरधर्मीय विवाहासाठी अनुमती मिळू नये, अशा तरतुदी असणे अत्यावश्यक आहे.’’

क्षणचित्रे

१. या प्रसंगी अन्य घोषणांसमवेत ‘लाना होगा-लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ही घोषणा देण्यात आली.

२. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जानेवारी या दिवशी गडहिंग्लज शहरात म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी या प्रसंगी केले.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादच्या विरोधात राज्यभरात निघणार्‍या मोर्च्यांमध्ये हिंदू सहस्रोंच्या संख्येने  सहभागी होत आहेत, यावरून ‘लव्ह जिहाद’च्या आघाताची दाहकता लक्षात येते ! सरकारने आता तरी लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !