‘लव्ह जिहाद’चे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धाचे तुकडे करण्यापर्यंत !

केंद्र सरकारने लव्ह जिहाद्यांना निधर्मी कायद्याद्वारे मिळणारे संरक्षण रहित करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

११ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जिहाद ते लव्ह जिहाद आणि त्यासाठी केल्या जाणार्‍या क्लृप्त्या, ‘माझा अब्दुल तसा नाही’, ही हिंदु तरुणींची धोकादायक मानसिकता आणि हिंदु तरुणींवर हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव असणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग येथे देत आहोत.

(भाग २)

आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/635074.html


६. विदेशातही लव्ह जिहाद !

अ. ‘शीख लिबरल पॉलिटिक्स ब्लॉगर’ (शीख उदारमतवादी राजकारणाविषयी संकेतस्थळावर लेख लिहिणारे) सनी हुंदल यांच्या मते ‘९० च्या दशकात एका गुप्त पत्रकाच्या (हिज्ब उत-तहरीर अनुयायांकडून) माध्यमातून मुसलमान पुरुषांना आग्रह करण्यात आला होता की, त्यांनी शीख मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यासाठी फूस लावावी.’ वर्ष २०१४ मध्ये इंग्लंडमध्ये शिखांच्या अकाल तख्तने ‘लव्ह जिहाद’ला गांभीर्याने घेतले. तेथे हा विषय ‘रोमिओ जिहाद’ आणि ‘ग्रुमिंग जिहाद’ या नावाने ओळखला जातो. तेथील काही धर्मांधांचे समूह किंवा चांगले दिसणारे पाकिस्तानी मुसलमान युवक हे ख्रिस्ती, शीख आणि हिंदु मुलींना प्रभावित करून जाळ्यात ओढण्यासाठी, तसेच त्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करून इस्लामिक स्टेटमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करत होते. काही मुलींना मुसलमान बनवून पाकिस्तानमध्ये नेऊन सोडले जात होते आणि तेथे त्यांना घरात गुलामांसारखे रहावे लागत होते.

आ. या संदर्भात वर्ष २००९ मध्ये लंडनचे पोलीस आयुक्त सर इयान ब्लेयर यांनी खुलासा केला, ‘अल्पवयीन मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यासाठी भाग पाडणार्‍या धर्मांधांना पोलिसांकडून ओळखले जात आहे. पोलीस अशा प्रकारच्या आक्रमक धर्मांतराला आळा घालण्यासाठी विश्वविद्यालयांसमवेत काम करत आहेत.’

इ. काही आतंकवादी इस्लामी संघटनांची मुले शीख आणि हिंदु मुलींना धर्मांतरित करण्यासाठी कटकारस्थान करतात अन् मानहानी करण्याची धमकी देतात. एवढेच नाही, तर भीती दाखवण्यासह मारहाणही करतात. त्यामुळे तेथे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागले आहे. ते ख्रिस्ती मुलींना फूस लावून मुसलमान बनवत होते. ते मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी प्रेमाचे ढोंग करणे, ‘ब्लॅकमेलिंग’ करणे आणि स्वत:ला ख्रिस्ती असल्याचे खोटे सांगून शारीरिक संबंध बनवणे अशी अनेक कटकारस्थाने करत होते. जेवढ्या प्रतिष्ठित कुटुंबांतील मुलींना या जाळ्यात ओढले जात होते, तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना पुरस्काराची रक्कम दिली जात होती.

ई. मिस्रमध्ये कॉप्टिक ख्रिस्ती (इजिप्तमधील ख्रिस्त्यांची जात), विशेषत: तरुण ख्रिस्ती मुलींच्या विरोधात हिंसाचाराच्या वाढीवर चर्चा करण्यासाठी २२ जुलै २०११ या दिवशी ‘अमेरिकी हेलसिंकी आयोग’ स्थापन करण्यात आला. फ्रान्समधील मिस्रचे मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष जीन मेहर ने यांच्यानुसार वर्ष २००९ पासून २०११ पर्यंत अनुमाने ८०० कॉप्टिक ख्रिस्ती महिलांचे अपहरण, बलात्कार करून त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी भाग पाडण्यात आले.

श्री. रमेश शिंदे

७. नातेवाइकांशी लग्न केल्याने निर्माण झालेल्या अनुवंशिक आजारांच्या समस्येला प्रतिबंध करण्यासाठी लव्ह जिहाद !

अ. इस्लाम त्यांच्या अनुयायांना चुलत बहिणींशी लग्न करण्याची अनुमती देतो. आरोग्यतज्ञांच्या मते त्याला एक प्रथा म्हणून स्वीकारल्यामुळे अनेक अनुवंशिक आजारांची प्रकरणे वाढली आहेत. या प्रथेचे पालन करणार्‍या पाकिस्तानी लोकांवर जर्मनीच्या ‘डी डब्ल्यू न्यूज’ने अहवाल सिद्ध केला आहे. पाकमधील ५६ वर्षांचे गफूर हुसैन शाह ८ मुलांचे पिता आहेत. ते ‘डी डब्ल्यू न्यूज’शी बोलतांना म्हणाले, ‘‘आमच्याकडे नातेवाइकांमध्ये लग्न न करणार्‍या लोकांना समाजातून बहिष्कृत केले जाते. आमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासात रक्तविकार, शिकण्यास सक्षम नसणे, आंधळेपणा, बहिरेपणा आदी समस्या आहेत.’’ आधुनिक वैद्यांच्या मते हे ‘इंब्रिडिंग’मुळे (जवळच्या नात्यामधील प्रजननामुळे) होते.

आ. पाकिस्तानमध्ये ‘जेनेटिक म्युटेशन’वर (अनुवांशिक उत्परिवर्तनावर) वर्ष २०१७ चा एक अहवाल सिद्ध करण्यात आला. त्यामध्ये ‘म्युटेशन’चे प्रकार आणि त्याच्याशी संबंधित विकार यांवर विवरण करण्यात आले आहे. अहवालाच्या माहितीनुसार पाकिस्तानात रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने अनुवंशिक आजार वाढत आहेत. एका माहितीनुसार पाकिस्तानमध्ये आढळणार्‍या १३० विविध प्रकारच्या अनुवंशिक आजारांमध्ये १ सहस्रांहून अधिक ‘म्युटेशन’ आढळून आले आहे.

इ. आज मुसलमानांमध्ये वाढती अनुवंशिक आजारांची समस्या पाहून इस्लामच्या जागतिक वर्चस्वाच्या स्वप्नावरही संशय निर्माण होत आहे. या कारणानेही इस्लामला पुढे जाण्यासाठी आता ‘लव्ह जिहाद’ किंवा बलपूर्वक धर्मांतर यांच्या माध्यमातून मुसलमानेतर मुलींना मुसलमान बनवून त्यांच्या गर्भातून सुदृढ इस्लामी वंश निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.

८. भारतातून बेपत्ता होणार्‍या महिलांचे काय होते ?

अ. एकीकडे लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या एका अभ्यासानुसार देशात बेपत्ता होणार्‍या महिला आणि मुले यांची संख्या वाढत आहे. वर्ष २०१६ ते २०१८ या कालावधीत सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये बेपत्ता महिला अन् मुले यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

आ. राष्ट्रीय गुन्हेगारी नोंदणी विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्र, बंगाल आणि मध्यप्रदेश या ३ राज्यांमध्ये ३ वर्षांत सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. वर्ष २०१६ मध्ये महाराष्ट्रात २८ सहस्र ३१६, वर्ष २०१७ मध्ये २९ सहस्र २७९ आणि वर्ष २०१८ मध्ये ३३ सहस्र ९६४ महिला बेपत्ता झाल्या आहेत. मुंबईमध्ये वर्ष २०१७ आणि २०१८ मध्ये ४ सहस्र ७१८ अन् ५ सहस्र २०१ महिला बेपत्ता होण्यासह अशा घटनांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे. बंगालमध्ये वर्ष २०१६ ते २०१८ या कालावधीत बेपत्ता महिलांची संख्या क्रमश: २४ सहस्र ९३७, २८ सहस्र १३३ आणि ३१ सहस्र २९९ होती. मध्यप्रदेशात या ३ वर्षांमध्ये महिलांच्या बेपत्ता होण्याच्या २१ सहस्र ४३५, २६ सहस्र ५८७ आणि २९ सहस्र ७६१ तक्रारी नोंदवल्या गेल्या.

इ. राष्ट्रीय गुन्हेगारी नोंदणी विभागाच्या अहवालात म्हटले आहे, ‘काही तरुण घरात मिळत असलेली चुकीची वागणूक आणि सहन न करण्यासारखी परिस्थिती यांमुळे घरातून पळून जातात. ते मानवी तस्करी, हिंसाचार, अमली पदार्थांचे व्यसन, वेश्या वृत्ती आणि शोषण आदी संकटांच्या दृष्टीने असुरक्षित होतात. अनेक बेपत्ता व्यक्तींची निश्चितच तस्करी होत आहे.’

एवढ्या मोठ्या संख्येने देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि अन्य राज्यांतील महिला गायब होत आहेत, तर या विषयाला गांभीर्याने का घेतले जात नाही ? ‘लव्ह जिहाद’शी याचा संबंध आहे का? या बेपत्ता होणार्‍या महिलांचे काय होते ? त्यांचे जीवन श्रद्धासारखे (देहलीत आफताब अमीन पूनावालाने त्याची प्रेमिका आणि हिंदु युवती श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले त्याप्रमाणे) संकटात तर नाही ना ? त्यांना देहव्यापारात ढकलले जाते का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवणे आवश्यक आहे. तेव्हाच देश महिला आणि मुले यांच्या दृष्टीने सुरक्षित म्हणता येईल.

९. प्रेम असेल, तर धर्मांतराची आवश्यकता का ?

भारतात विवाहाच्या संदर्भात दोन समांतर कायदेप्रणाली आणि विवाहाचे अनुबंध करणार्‍या व्यवस्था आहेत. भारतात ‘पर्सनल लॉ’ची (व्यक्तीगत कायद्याची) आश्चर्यकारक व्यवस्था आहे. मुसलमानांना ‘शरीयत कायद्यां’तर्गत आणि हिंदूंना ‘हिंदु विवाह अधिनियमा’च्या अंतर्गत नोंदणी करण्याची अनुमती आहे. त्याच प्रकारे भिन्न धर्माचे दांपत्य असेल, तेव्हा त्यांच्यासाठी एक ‘विशेष विवाह अधिनियम’ (स्पेशल मॅरेज ॲक्ट)ही आहे, ज्याला विशेष स्वरूपात ‘रजिस्टर विवाह’ (नोंदणीकृत विवाह) स्वरूपात समजले जाते.

‘हिंदु विवाह अधिनियम’ आणि ‘विशेष विवाह अधिनियम’ यांच्यात पती अन् पत्नी यांचे अधिकार आणि दायित्व थोड्या फार प्रमाणात सारखे आहेत; परंतु शरिया कायद्यानुसार तसे नाही. इस्लाममध्ये पत्नीचे अधिकार अल्प असतात. तुम्ही पाहू शकता की, लव्ह जिहादच्या उदाहरणांमध्ये नेहमीच एक मुसलमानेतर मुलगी सहभागी असते. वास्तविक शरिया कायद्याच्या अंतर्गत लग्नासाठी महिला आणि पुरुष दोघेही मुसलमान असणे आवश्यक आहे. त्याच्या संदर्भात कुराणमध्ये (२.२२१) लिहिले आहे, ‘अनेकेश्वरवादी (अनेक देवतांचे पूजन करणारे हिंदू) स्त्रियांशी लग्न करू नका. जोपर्यंत ते इमान (इस्लामवर विश्वास) आणत नाहीत आणि एक इमानवाली दासी एका मूर्तीपूजक स्त्रीहून अधिक चांगली आहे, भलेही ती तुम्हाला प्रसन्न करणारी असेल.’

या कारणामुळे लव्ह जिहादच्या अनेक प्रकरणांमध्ये धर्मांध युवक ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’ऐवजी शरिया कायद्यानुसारच लग्न करण्यासाठी मुलीवर दबाव टाकतात. जर मुलीने ‘शरिया कायद्या’नुसार स्वेच्छेने लग्न केले, तर ती तिच्या सध्याच्या सर्व अधिकारांना वंचित होते. इस्लामी शरिया कायद्यानुसार ‘लग्न हे एक कंत्राट (कॉन्ट्रॅक्ट) आहे. तो हिंदु संस्कृतीप्रमाणे एक संस्कार नाही’, असे म्हटले जाते. विशेष विवाह अधिनियमाच्या अंतर्गत फारच नगण्य लग्न होतात. मुलगा-मुलगी यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र बनवले जाते, त्यावरून मुलीला वाटते की, ‘विशेष विवाह अधिनियमा’च्या अंतर्गत ती विवाहित आहे. काही वर्षांनी तिला कळते की, तिचा ‘निकाह’ (लग्न) न झाल्यामुळे शरियानुसार तिची कोणतीही कायदेशीर स्थिती नाही, ना तिच्याकडे कोणता अधिकार आहे.

१०. लव्ह जिहाद्यांच्या पाठिशी सेक्युलर (निधर्मी) कायदाव्यवस्था असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे

आई-वडील त्यांच्या मुलीला लहानपणापासूनच मोठ्या लाडात शिकवतात आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ‘ती लग्नानंतर दुसर्‍या कुटुंबात जाणार आहे. त्यामुळे तिला काहीच न्यून राहू नये, असा त्यांचा भाव असतो. जेव्हा ही मुलगी लव्ह जिहादमध्ये फसते, तेव्हा तिच्या या सर्व गोष्टींच्या स्मृती नष्ट होतात. एके दिवशी ती एखादा पेंटर, मेकॅनिक, रिक्शावाला किंवा पंक्चरवाला यांच्या समवेत पळून जाते. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. लव्ह जिहादच्या षड्यंत्राविषयी अज्ञानी असलेली मुलगी काही काळापूर्वी ओळख झालेल्या धर्मांध तरुणावर संपूर्ण विश्वास दाखवून तिच्याच आईवडिलांच्या विरोधात मॅजिस्ट्रेटसमोर (न्यायाधिशांच्या समोर किंवा दंडाधिकार्‍यांसमोर) साक्ष देते. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्याचा संदर्भ देऊन स्वत:च जीवनाचा निर्णय घेते.

ज्या आई-वडिलांनी १८ वर्षांपर्यंत त्यांच्या मुलीला फुलासारखे जपले, त्या मुलीवर त्यांचा क्षणभरही अधिकार शिल्लक रहात नाही. केवळ १८ वर्षे पूर्ण झाल्याने तिला समाजात जगण्याची आणि स्वत:विषयी निर्णय घेण्याची समज येते का ? आई-वडिलांच्या अनुभवाला कोणतेही महत्त्व नसते ? नियमित विवाहासाठी, तर अनेक प्रकारे विचारपूस, पसंत-नापसंत पाहिले जाते; पण येथे एका क्षणात आई-वडिलांना तिचे शत्रू असल्यासारखी वागणूक दिली जाते. येथे देशाचा धर्मनिरपेक्ष कायदा मुलगी केवळ १८ वर्षांची झाल्याने तिला सज्ञान समजून  संरक्षण देतो आणि आई-वडिलांच्या हितचिंतक निर्णयाला नाकारतो. जेव्हा आपले वाहन दुसर्‍याला देतो, तेव्हा जुन्या मालकाची ‘एन्.ओ.सी.’ (ना हरकत प्रमाणपत्र) घ्यावी लागते; परंतु या जिवंत मुलीच्या जीवनावर आई-वडिलांचा कोणताही अधिकार नाही, हा मोठा विचित्र कायदा आहे ! दुर्दैवाने याचा वापर लव्ह जिहादींच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.

११. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमान लोकसंख्या वाढवण्याचे षड्यंत्र !

आज मुसलमानांनी ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांच्या ‘व्हिजन-२०४७’ च्या संकल्पनेनुसार संपूर्ण भारताच्या भूमीवर इस्लामी शासन स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच कारणाने भारतात सुपीक भूमीच्या तुलनेत लोकसंख्येत होणार्‍या वृद्धीचा विचार न करता मुसलमानांकडून ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ आणि ‘समान नागरी कायदा’ यांना विरोध करण्यात येत आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी शरीयतचा आधार घेऊन २-४ लग्न करण्याच्या सुविधेचा वापर करण्यात येतो. हिंदु मुलीशी विवाह करून तिला इस्लाम पद्धतीने मुसलमान बनवले जाते. नंतर तिच्याकडून २-३ मुले जन्माला घालून तिला तलाक (घटस्फोट) दिला जातो. नंतर त्यांचा पुन्हा नवीन मुलीचा शोध चालू होतो. अशा प्रकारे अधिकाधिक मुसलमान मुले जन्माला घालण्यासाठी हिंदु मुलीच्या गर्भाशयाचा वापर केला जात आहे. लव्ह जिहादचा ‘गर्भाशय जिहाद’च्या रूपातही वापर करण्यात येत आहे.

१२. लव्ह जिहादमध्ये हिंदु सून हवी;  पण हिंदु तरुणाला मुसलमान मुलीशी विवाह करण्याची अनुमती नसणे

अनेक निधर्मीवादी आणि मुसलमान नेते लव्ह जिहादच्या संदर्भात बोलतांना ‘हे दोन प्रेमींचे प्रेम आहे. सर्व धर्मांच्या लोकांनी बंधुभावाने राहिले पाहिजे’, अशा प्रकारे मुसलमान मुलाशी हिंदु मुलीचे प्रेम अन् लग्न करणे यांचे समर्थन करतात; परंतु तेच लोक जेव्हा हिंदु तरुणाला एखाद्या मुसलमान मुलीशी लग्न करायचे असते, तेव्हा गप्प रहातात. अलीकडेच अशा प्रकारे केवळ मुसलमान मुलीशी प्रेम केल्यावरून अनुमाने ३५ हिंदु तरुण आणि मुसलमान मुली यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्या हत्या केल्या. जेव्हा अंकित सक्सेना, खेताराम भील, अंशू साहनी, नागराजू, दीपक बर्डे यांच्यासारख्या अनेक हिंदूंना जीव गमवावा लागला, तेव्हा प्रेमाचे महत्त्व सांगण्यासाठी कोणताही निधर्मीवादी किंवा मुसलमान नेता समोर आला नाही.

(क्रमशः)

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (५.१२.२०२२)

धर्माभिमान हा धर्मशिक्षणाने आणि ते आचरणात आणून निर्माण झालेल्या आत्मबळानेच निर्माण होऊ शकतो !