आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम

ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम आणि कसाब

नागपूर – वर्ष २००८ मध्ये मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील मुख्य आरोपी अजमल कसाब याने कारागृहात मटण बिर्याणी मागितली होती, ही बातमी जाणीवपूर्वक मीच पेरली होती, असे विद्यमान राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले. येथील एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

याविषयीचा उद्देश स्पष्ट करतांना ते म्हणाले,

१. कसाबचा खटला चालू असतांना रक्षाबंधनाचा दिवस असल्याने माझ्या हाताला राखी बांधलेली होती. कसाबने याविषयी विचारल्यावर मी त्याला रक्षाबंधनाच्या दिवसाचे महत्त्व सांगितले. इतक्यात न्यायाधीश न्यायासनावर आले.

२. माझा आणि कसाबचा संवाद त्यांना सांगितल्यानंतर कसाबने मान खाली घातली आणि डोळे पुसल्यासारखे केले. न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या माध्यमांनी लगेचच ‘कसाबच्या डोळ्यांत पाणी’ असे ठळक वृत्त दिले. कसाबविषयी सहानुभूती निर्माण होऊ नये, यासाठी मी माध्यमांना जाऊन सांगितले की, कसाबने मटण बिर्याणी मागितली. त्यानंतर लगेचच ते वृत्त दाखवले जाऊ लागले.

३. दुसर्‍या दिवशी न्यायालयात कसाबच्या अधिवक्त्यांनी आदल्या दिवशीच्या घटनेविषयी विचारले. मी म्हटले, ‘‘तो पाकिस्तानातून आला आहे, प्रतिदिन मांसाहार करत असेल. मग बिर्याणी मागितली नसेल का ? त्यालाच विचारा.’’ न्यायालयातील चर्चा कसाबला पूर्ण ठाऊक नव्हती. बिर्याणी देण्याविषयी बोलणे चालू असल्याचे वाटून त्याने लगेच मान हलवली. त्यामुळे ‘कसाबने बिर्याणी मागितली’, अशी वृत्ते दाखवली गेली. त्याने खरंच बिर्याणी मागितली होती कि नाही, हे केवळ त्यालाच ठाऊक असेल.