(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’

काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांना पडले इंदिरा गांधी यांचे स्वप्न ?

काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत

जयपूर (राजस्थान) – जर इंदिरा गांधी जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घातली असती, असे म्हणत काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपच्या कथित ‘हुकूमशाही’वर खंत व्यक्त केली. येथे आयोजित ‘कायम रत्न पुरस्कार २०२६’ सोहळ्याला गहलोत संबोधित करत होते.

१. गहलोत यांनी आरोप केला की, देशाच्या लोकशाही संस्था दबावाखाली काम करत आहेत आणि लोकशाही कमकुवत होत आहे. त्यांनी बुलडोझर कारवाया, अन्वेषण यंत्रणांचे कामकाज आणि निवडणूक आयोगाची भूमिका यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गहलोत यांनी आरोप केला की, भाजप धर्म आणि ध्रुवीकरण यांचे राजकारण करत आहे अन् राज्यघटनेच्या मूळ भावनेच्या विरोधात काम करत आहे. (हिंदूंवर अन्याय करणारी कलमे राज्यघटनेत घुसडून काँग्रेसने धर्माच्या आधारावर या देशाचे वैचारिक विभाजन केले. अशी काँग्रेस भाजपवर असे आरोप कोणत्या तोंडाने करते ? – संपादक)

२. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, जर त्या आज हयात असत्या, तर धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍या पक्षावर बंदी घालण्यासारखी कारवाई करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. (धर्माच्या नावावर राजकारण करून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसवाल्यांना लोकांनी घरी बसवले, हे गैरसोयीचे सत्य गहलोत विसरले का ? – संपादक)

३. ते म्हणाले की, बंगालमध्ये मतदारसूचीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रकियेच्या नावाखाली लाखो मतदारांची नावे मतदारसूचीतून वगळण्यात आली, जे लोकशाहीसाठी एक चिंताजनक चिन्ह आहे. (ज्या काँग्रेसने बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व बहाल करून ओळखपत्रे वाटली आणि या घुसखोरांनी अनेक दशके काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले, अशा काँग्रेससाठी विशेष सखोल पुनरावलोकन प्रकिया चिंताजनकच असणार, यात काय आश्चर्य ? – संपादक)

संपादकीय भूमिका

५१ वर्षांपूर्वी ज्या इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादून विरोधकांचा आवाज दाबला, त्या गांधी यांची काँग्रेस आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी अशा विधानांतून गहलोत यांसारख्या एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते !