१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात संमेलनाचे आयोजन


पुणे –
‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे १०० वे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये पुण्यात होणारे हे १४ वे संमेलन आहे, अशी माहिती ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, ‘समर्थ युवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते. विद्यापिठाच्या मुख्य इमारतीचे प्रांगण, क्रीडा संकुल, छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे संमेलनातील महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळा परिसरात कवीकट्टा, कथाकथन असे उपक्रम होतील. शहरातील वाहतूककोंडी आणि सुविधा यांवर ताण पडू नये, यामुळे हे संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात घेण्याचा निर्णय घेतला, असे सोमण यांनी स्पष्ट केले. ‘नांदी शंभराव्या साहित्य संमेलना’ची या उपक्रमातून मुंबई, पुणे वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत, अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह, विविध भागांत संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांमधून आगामी संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम होतील, अशी माहिती योगेश सोमण यांनी सांगितली.

संपादकीय भूमिका

यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनातून धडा घेऊन वाचन आणि साहित्य प्रेमी संमेलनासाठी येतील, याकडे लक्ष द्यायला हवे. नाहीतर रिकाम्या खुर्च्या आणि साहित्यिकांची पाठ, असे चित्र पहायला मिळेल !