मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुरुड (जिल्हा रायगड) – मुरुड बसस्थानक आगारातील विविध समस्यांविषयी खेद व्यक्त करत जनसेवकांनी जनआक्रोश बैठक आयोजित केली होती. यात प्रवाशांच्या गैरसोयी, कर्मचार्‍यांचा अभाव, बंद असलेल्या सेवा आणि आगाराची दुरवस्था यांविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुरुड आगाराला मे महिन्याला १० लाख ५५ सहस्र रुपयांचा लाभ मिळाला असूनही प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागते, या पार्श्वभूमीवरही विरोध करण्यात आला.

या वेळी आगारप्रमुखांना कार्यमुक्त करून सक्षम अधिकारी नेमावा, तंत्रज्ञ कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, मुरुड-अलीबाग-पनवेल थेट सेवा चालू करावी, मुंबईला जाणार्‍या बसगाड्यांची संख्या वाढवावी, पावसाळ्यापूर्वी खराब स्थितीतील बसगाड्यांची दुरुस्ती करावी. १० वर्षांपासून बंद स्थितीत असलेला डिझेल पंप चालू करावा’, अशा मागण्या करण्यात आल्या.

विभागीय नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी लवकरच नवीन आगार व्यवस्थापकांची नियुक्ती केली जाईल, तर २५ जूनपर्यंत यांत्रिक कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

संपादकीय भूमिका

अशा बैठका घेण्याची वेळच का येते ? एस्.टी. महामंडळ या समस्या वेळच्या वेळी सोडवत का नाही ?