तुर्भे येथे डासांच्या प्रादुर्भावामुळे रहिवाशी त्रस्त !

नवी मुंबई, १० डिसेंबर (वार्ता.) – तुर्भे परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. जेवतांनाही तोंडामध्ये डास जातात, अशी परिस्थिती आहे. डासांमुळे रात्रीची झोपही लागत नाहीत. २४ घंटे डासांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

१. येथील पावसाळी गटारातील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. रहिवाशांनी चाळींतील आपापला परिसर धुतल्याने गटारांमध्ये पाणी तुंबून रहाते.

२. फेज २ आणि ए २ कॉलनी येथील मुसलमान कॅटरर्सवाले (भोजनालय) उरलेले अन्नपदार्थ आणि मोरीचे पाणी पावसाळी गटारांत सोडत आहेत. त्यामुळेही ते गटार तुंबते.

३. नियमानुसार पावसाळी गटारांत पावसाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य दिवसांत पाणी असता कामा नये; मात्र सध्या ३६५ दिवस गटारांत पाणी असल्यामुळेच डासांची उत्पत्ती अधिक झाली आहे.

४. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गटारांमध्ये धूर फवारणी आणि ऑईलिंग करणे अशा उपाययोजना केल्या जातात; मात्र मूळ समस्येवर उपाययोजना काढली जात नाही.

५. स्थानिक रहिवासी असोसिएशनही पावसाळी गटारात पाणी सोडणार्‍या उपद्रवी घरमालकांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे सहस्रो रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करून दिलासा मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी उपद्रवकारी कॅटरर्सवाल्यांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती तुर्भे नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. आठवड्यातून दोन वेळा गटारात धूर फवारणी करून डास-अळीनाशक ऑईल टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्यावर उपाययोजना काढावी !