भ्रष्टाचारामागे कोण आहेत ? त्यांची चौकशी व्हावी ! – प्रसाद रेळेकर, शिवसेना शहरप्रमुख, शिंदे गट

दापोली नगरपंचायतीत कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे प्रकरण

दापोली (जि. रत्नागिरी) – येथील नगरपंचायतीमध्ये ६५ ते ७० कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार झाला आहे. या आर्थिक अपहार प्रकरणी लेखापाल दीपक सावंत सध्या कोठडीत आहेत. या प्रकरणामागे अजून कोण आहेत का ? याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाचे दापोली शिवसेना शहरप्रमुख श्री. प्रसाद रेळेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की,

१. दोन मासांपूर्वी उघड झालेल्या या भ्रष्टाचार प्रकरणाची व्याप्ती फार मोठी आहे. ही अफरातफर आपल्या शहराला किमान १० वर्षे मागे नेणारी आहे.
२. नगरपंचायत प्रशासनाने केवळ १ एप्रिल २०२१ ते ३० मार्च २०२२ या एकाच वर्षाचा अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडे सादर केला आहे; मात्र या भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार असलेल्या दीपक सावंत यांच्या नोकरीच्या कालावधीतील व्यवहाराची आणि नगरपंचायतमधील १० वर्षांच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.
३. आमदार योगेश कदम यांच्याकडे या मागणीचे निवेदन आम्ही शहराच्या वतीने सादर केलेले आहे. आमदार योगेश कदम आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील याविषयी आम्हाला खात्री आहेच.

 (सौजन्य : Maze Kokan)

४. या भ्रष्टाचारामागे सावंत याचे अनेक साथीदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्याशी संबंधित सर्व घटकांवर या कोट्यवधी रुपयांच्या परतफेडीचे दायित्व निश्‍चित करून शहरातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा.
५. आमच्या शहराचा हक्काचा विकासनिधी आम्हाला परत मिळवून द्यावा.
६. या भ्रष्टाचाराचे दूरगामी परिणाम शहर विकासावर दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने विशेष समितीची स्थापना करून दापोली नगरपंचायतीचे सखोल लेखापरीक्षण करून भ्रष्टाचाराचा नेमका आकडा निश्‍चित करावा आणि या रक्कम वसुलीचे दायित्वही निश्‍चित करावे.

७. शहर विकासासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक निधी आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून नगरपंचायत आणि संबंधित खात्यांना प्राप्त झाला आहे. या निधीचा झालेला अपहार हा शहरातील नागरिकांसह इथल्या व्यापारी, दुकानदार, लघु उद्योजकांची घोर निराशा करणारा आहे, किंबहुना या सर्वांच्या मेहनतीचा अपमान करणारा असल्याचीच ठाम भावना आम्हां सर्वांचीच झाली आहे. यास्तव या भ्रष्टाचार प्रकरणातील सहभागी प्रत्येक घटकाला कोणत्याही परिस्थितीत सहानुभूती दाखवली जाणार नाही, असे अभिवचन आमदार योगेश कदम यांनी दिले आहे.
८. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून शहरवासियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे.

संपादकीय भूमिका

कोट्यवधी रुपयांच्या अपहाराची चौकशी करा, असे प्रशासनाला सांगावे का लागते ?