राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्‍या ८ जणांना अटक

आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई

प्रतिकात्मक चित्र

सावंतवाडी – आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या शिकार करणार्‍या एकूण ८ जणांना वन विभागाच्या पथकाने १७ जूनच्या रात्री अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी आरोपींकडून  गावठी ठासणीची बंदूक, काडतूस बंदूक, जिवंत आणि वापरलेली काडतुसे, तलवार, विजेर्‍या, एक आलिशान चारचाकी वाहन आणि शिकार केलेले २ दुर्मिळ वन्यजीव आदी मुद्देमाल कह्यात घेतला.

मासुरू येथील शासकीय जंगलात सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या साळिंदर या वन्यजिवाची शिकार करून त्याला घेऊन जात असतांना विठू वाघू कोकरे (चौकुळ, सावंतवाडी) याला वन विभागाच्या पथकाने अनुमाने दीड किलोमीटर पाठलाग करून पकडले. दुसर्‍या कारवाईत आंबोली शिरगांवकर पॉईंट येथे जंगलात फिरणारे पवन प्रकाश देसाई, जावेद सलीम जमादार, हसीम हुसेन काजी, वनू विठ्ठल फोंड आणि आकाश मोहन कुरणे (सर्व कोल्हापूर), भरत नवलू पाटील (चौकुळ, सावंतवाडी) आणि गणेश तुकाराम पाटकर (पुणे)  या ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मृत गेळा/पिसोरी (माऊस डिअर) आणि १ कटीदर (एशियन पाम सिव्हेट) हे वन्यजीव आणि अन्य साहित्य कह्यात घेण्यात आले. परिसरात शिकारीच्या उद्देशाने कुणी संशयास्पदरित्या फिरतांना आढळल्यास नागरिकांनी त्वरित वनक्षेत्रपाल श्री. वैभव वि. भिसे यांच्या ९५०३९७३८०२ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवननसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.