मूळचे सांगली येथील आणि आता गोवा येथे स्थित झालेले पू. सदाशिव नारायण परांजपे (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव नारायण परांजपे यांना लहान वयापासूनच विज्ञान शाखेत शिकण्याची आवड असूनही त्यांनी काकांच्या व्यवसायाचे उत्तरदायित्व सांभाळले. देवावरील श्रद्धेमुळे ते व्यवसाय सांभाळतांना आलेल्या अनंत अडचणींना सहजतेने सामोरे गेले. पू. परांजपेआजोबांनी घेतलेले परिश्रम आणि देवाची कृपा यांमुळे त्यांची व्यवसायात भरभराट झाली. विवाहानंतर त्यांची पत्नी पू. (सौ.) शैलजा यांनीही त्यांना संसारात उत्तम साथ दिली. त्यांची मोठी कन्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे त्यांना साधनेची ओळख होऊन त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. पुढे साधनेची आवड निर्माण झाल्यावर त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा निर्माण झाली. त्यांची साधनेची तळमळ आणि गुरूंची अपार कृपा यांमुळे ऑगस्ट २०१३ मध्ये त्यांची ६१ टक्के पातळी घोषित झाली. गुरूंचे आज्ञापालन करून १३.५.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. संत झाल्यानंतरही सतत सेवारत रहाणार्‍या पू. सदाशिव नारायण परांजपे यांचा साधनाप्रवास आपण पाहूया.

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

१. जन्म

‘माझे नाव श्री. सदाशिव नारायण परांजपे, वय ७९ वर्षे आहे. माझा जन्म १६.१२.१९४२ या दिवशी सांगली येथे पेठ भागातील देवल वाड्यामधे झाला.

२. कुटुंबीय

‘माझे वडील श्री. नारायण पांडुरंग परांजपे आणि आई सौ. आनंदीबाई अन् आम्ही पाच भाऊ-बहीण’, असे आमचे परांजपे कुटुंब होते. माझे थोरले भाऊ (कै. विठ्ठल नारायण परांजपे) नंतर थोरली बहीण निर्मलाताई (कै. (सौ.) निर्मला चिपळूणकर) नंतर सिंधुताई (कै. (श्रीमती) शरयू सहस्रबुद्धे) आणि माझ्यापेक्षा मोठी इंदूताई (कै. (सौ.) सुलभा पाटणकर) अन् शेवटी मी सदाशिव (टोपण नाव नंदा) !

३. बालपण आणि शिक्षण

३ अ. सांगलीमध्ये गावभागात असलेल्या आमच्या घराजवळ कृष्णा नदी होती. त्यामुळे मी जवळजवळ ५ वर्षे नदीत अंघोळ केली आणि वयाच्या १० ते १८ व्या वर्षापर्यंत नदीत पोहायलाही जात असे.

३ आ. आई-वडिलांनी केलेले धार्मिक संस्कार : माझे आई-वडील धार्मिक होते. आमच्या घरी सर्व सणवार व्यवस्थित होत असत, तसेच श्राद्ध आणि पक्ष इत्यादी विधी गुरुजींना बोलावून केले जात असत. माझे वडील प्रतिदिन सायकलने सांगलीपासून ४ कि.मी. असलेल्या बागेतल्या गणपतीच्या दर्शनाला जायचे. मी संध्याकाळी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणणे अन् इतर वेळी सर्वांना साहाय्य करत असे.

३ इ. ‘वडिलांनी संस्काराच्या माध्यमातून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न करून घेतले’, असे वाटणे : माझे वडील स्वभावाने पुष्कळ रागीट होते, तसेच ते शिस्तप्रिय होते. त्यांच्या स्वभावामुळे साहजिकच आम्हा सर्वांना शिस्तीने वागण्याची सवय झाली. (साधनेत आल्यावर शिस्तीने वागण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.) त्या वेळी ‘वडिलांनी संस्कारांच्या माध्यमातून आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यासाठी प्रयत्न करून घेतले’, असे मला वाटते.

३ ई. अधिकोषाचे कर्ज न फिटल्याने आणि त्यातच वडिलांची दोन शस्त्रकर्मे झाल्यामुळे घर विकावे लागणे : माझ्या वडिलांचा ‘सायकल आणि स्टोव्ह, गॅस-बत्ती (गॅसवर चालणारे दिवे. पूर्वी वरातीत डोक्यावर हे दिवे घेऊन जात असत.) यांची दुरुस्ती अन् त्यांची विक्री करणे’, हा व्यवसाय होता. आमचा व्यवसाय व्यवस्थित चालू होता; परंतु घरासाठी काढलेले अधिकोषाचे (बँकेचे) कर्ज फिटत नव्हते. त्यातच वडिलांची दोन शस्त्रकर्मे (ऑपरेशन्स) झाली. त्यामुळे आम्हाला घर विकावे लागले.

३ उ. व्यायामामुळे प्रकृती उत्तम असणे : आम्ही सांगली येथील गावभागात अंदाजे ५ – ६ वर्षे राहिलो. मी वयाच्या १० व्या वर्षापासून १८ व्या वर्षापर्यंत व्यायाम करण्यासाठी जात असे. मला ती आवड असल्यामुळे मी तालमीत जाऊन सूर्यनमस्कार, जोर, बैठका, तसेच मधे मधे ‘डबल बार’वर, प्रेस जोर, दसरंग, तबकफाड (मलखांबाचे प्रकार) अशा प्रकारचे व्यायाम करायचो. त्यामुळे माझी प्रकृती उत्तम होती. कदाचित् या व्यायामामुळेच मी व्यवसायात भरपूर कष्ट करू शकलो.

३ ऊ. घरात सर्वांत लहान असल्याने सर्वांनी सांगितलेली कामे करावी लागणे अन् अहं अल्प होण्यास साहाय्य होणे : ‘मी घरात सर्वांत लहान असल्यामुळे आपोआप माझ्यावर दळण आणणे आणि नातेवाइकांकडे निरोप देणे’, अशी लहान-मोठी कामे असायची. ‘मी सर्व भावंडांमध्ये लहान असल्याने सर्वांचे ऐकून कामे केल्याने माझा अहं अल्प होण्यास साहाय्य होत होते’, हे आता मला समजले. माझे वडील रागीट होते. त्यामुळे त्यांनी मला सांगितलेले काम त्याच वेळी करणे क्रमप्राप्त असायचे.

३ ए. ‘विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याची इच्छा असणे आणि शीतपेये विक्रीचा व्यवसाय करावा’, अशी देवाची इच्छा असणे : माझे शिक्षण दहावी (मॅट्रिक) पर्यंत झाले. मी फार हुशार नव्हतो; पण मला ५० ते ५५ टक्यांपर्यंत गुण मिळायचे. माझी पुढचे शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याची इच्छा होती; पण ‘मी शीतपेये (कोल्डड्रिंक्स) विक्रीचा व्यवसाय करावा’, अशी देवाची इच्छा होती.’

– (पू.) सदाशिव नारायण परांजपे, ढवळी, फोंडा, गोवा. (३.८.२०२१)

(क्रमशः)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक