उत्तरप्रदेशात बुलडोझरने रस्त्याच्या चौपदरीकरणात बाधा बनलेली मजार पाडली !

अलीगड-कानपूर रस्त्यावरील मजारीला २ मासांपूर्वी पाडण्याचा प्रयत्न झाल्यावर मुसलमानांनी केला होता विरोध !

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे)

कानपूर (उत्तरप्रदेश) – राज्यातील अलीगड आणि कानपूर या शहरांतील रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात एक मजार येत असल्याने बुलडोझर फिरवून ती पाडण्यात आली. मजार पाडण्याच्या आधी संबंधित गावकर्‍यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. २ मासांपूर्वीही यासाठी प्रयत्न केला असता स्थानिक मुसलमान गावकर्‍यांनी यास विरोध करत प्रशासनाला मजार पाडण्यापासून रोखले होते. तेव्हापासून हे काम बंद होते.

उत्तरप्रदेशातील अलीगड ते कानपूर येथील ‘जीटी रस्त्या’चे चौपदरीकरण करण्याचे काम जोमाने चालू आहे. हे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. त्यातच चौबेपूर आणि शिवराजपूर या गावांमधील असलेली मजार मध्ये येत असल्याने तिला पाडणे आवश्यक होते. १४ सप्टेंबर या दिवशी या कारवाईच्या वेळी घटनास्थळी बिल्हौरच्या उपविभागीय दंडाधिकारी अलका लांबा आणि पोलीस उपायुक्त वीजेंद्र द्विवेदी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

या प्रसंगात जर हिंदूंचे मंदिर असते आणि विरोध करणारे साहजिकच हिंदू असते, तर त्यांच्याविरोधात भारतभरातील धर्मनिरपेक्षतावादी जमातीने टीकेची झोड उठवून ‘विकासविराधी’ म्हणत त्यांना हिणवले असते. या प्रकरणात मुसलमान असल्याने आता योगी आदित्यनाथ प्रशासनाला हीच जमात ‘मुसलमानविरोधी’ संबोधून हिणवू लागली, तर आश्‍चर्य वाटायला नको !