बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांची युती संपुष्टात

मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे त्यागपत्र

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार सरकारमध्ये सत्ताधारी जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. यासंदर्भातील घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ९ ऑगस्टला दुपारी केली. त्यांनी राज्यपालांकडे त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. यानंतर ते बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांच्या घरी जाऊन पक्षाचे नेते अन् आमदार तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आता या दोन्ही पक्षांमध्ये युती होऊन सरकार स्थापन होईल, असे सांगितले जात आहे. यात तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते.

१. मागील काही दिवसांपासून भाजप आणि जनता दल (सं) यांची युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदार यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी वरील घोषणा केली. नीतीश कुमार म्हणाले की, भाजपने आम्हाला नेहमीच अपमानित केले. एका षड्यंत्राच्या अंतर्गत आम्हाला नष्ट करण्याचा भाजपने प्रयत्न केला.

२. बिहारमधील २४३ जागा असलेल्या विधानसभेत सध्या राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वांत मोठा असून त्याचे ७९ आमदार आहेत. दुसरा क्रमांक भाजपचा असून त्याचे ७७, त्यानंतर जनता दल (सं) ४५, काँग्रेस १९, तर साम्यवादी पक्षांचे १२ आमदार विधानसभेत आहेत. सत्ता स्थापनेसाठी एकूण १२२ जागा आवश्यक आहेत.