कारागृहातून जामीन मिळाल्यावर जल्लोषात मिरवणूक काढणार्‍या रियाझ शेखसह ६ जणांवर गुन्हा नोंद !

कोल्हापूर – आमदारांना ‘मंत्रीपद’ देण्याच्या आमिषाने त्यांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या ‘रॅकेट’चा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला होता. यात रियाझ शेख एक प्रमुख आरोपी होता. त्याला १९ जुलै या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात रियाझला जामीन मिळाल्यावर त्याची शिरोली पुलाची येथे जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यात चारचाकी गाडीच्या बोनेटवर बसून फटाक्यांची आतषबाजी करत, फुलांची उधळण करत मोठ्या आवाजात गाणी लावून तो शिरोलीत आला. रियाझच्या मिरवणुकीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. यानंतर रियाझ शेखसह ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. (एकदा गुन्हा केल्यावर कारागृहात जामिनावर सुटका केल्यावर परत येतांना जल्लोषी मिरवणूक काढणे म्हणजे संबंधितांना कायद्याचा कसलाचा धाक नाही, हेच सिद्ध होते ! अशा उद्दाम गुन्हेगारांना पुन्हा कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कारागृहातून बाहेर आल्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढणार्‍या सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक !