तांब्याची भांडी वापरण्याचे विविध आरोग्यदायी लाभ

जुन्या काळात लोक पिण्याचे पाणी साठवण्यासाठी धातूची भांडी वापरत. त्यातच तांब्याच्या भांड्यांचा वापर प्रामुख्याने पाणी साठवण्यासाठी केला जात असे; कारण तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात. यामुळेच आयुर्वेद आणि विज्ञानही तांब्याच्या भांड्यामधील पाणी मानवी आरोग्यासाठी लाभदायी मानतात.

१. पचनसंस्था

तांब्याची भांडी

तांबे पोट, यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या अवयवांचे ‘डिटॉक्सिफिकेशन’ (विष काढण्याची प्रक्रिया) करते. याताल काही गुणधर्म पोटाला हानी पोचवणारे ‘बॅक्टेरिया’ (जिवाणू) नष्ट करतात. त्यामुळे पोटात अल्सर आणि इन्फेक्शनची (संसर्ग होण्याची) समस्या कधीच होत नाही.

२. जखमा लवकर भरण्यास साहाय्यक

तांब्यामध्ये ‘अँटीबॅक्टेरियल’ (जिवाणूरोधक), ‘अँटीव्हायरल’ (विषाणूविरोधी) आणि अँटीइंफ्लेमेटरी (विरोधी दाहक) गुणधर्म असल्यामुळे ते जखमा लवकर भरण्यास साहाय्य करते. यासह तांबे रोगप्रतिकारशक्ती वाढवून नवीन पेशींच्या निर्मितीमध्येही साहाय्य करते.

३. दीर्घकाळ तरुण दिसणे

तांब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तोंडवळ्यावरील बारीक रेषा दूर करते. तसेच ते मुक्त ‘रॅडिकल्स’पासून (धातूसंबद्ध) संरक्षण करून त्वचेवर एक संरक्षणात्मक स्तर सज्ज करते. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसता.

४. जिवाणूंचा अत्यंत प्रभावीपणे नाश करण्याची क्षमता

तांब्यामध्ये ‘ऑलिगोडायनामिक’, म्हणजे जिवाणूंवर धातूंचे निर्जंतुकीकरण करण्याचा प्रभाव असतो. निसर्गत: त्यात जिवाणूंचा अत्यंत प्रभावीपणे नाश करण्याची क्षमता आहे, तसेच तांबे हे विशेषतः आपल्या वातावरणात आढळणाऱ्या आणि मानवी शरिरातील गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या E. coli आणि S. aureus या जिवाणूंविरुद्ध प्रभावी आहे.

पेशींच्या निर्मितीपासून ते अशक्तपणाची कमतरता दूर करण्यासाठी तांबे हा एक प्रभावी उपाय आहे.

५. सांधेदुखीच्या वेदना न्यून होणे

तांब्यामध्ये असलेले दाहकविरोधी गुणधर्म वेदना न्यून करण्याचे काम करतात. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी जरूर प्यावे. तसेच तांब्याचे पाणी मजबूत हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती राखण्याचे काम करते.

६. लठ्ठपणा न्यून होणे

अल्प वेळात वजन न्यून करण्याचा विचार करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्रतिदिन प्यावे. तांब्याचे पाणी पचनक्रिया सुधारते आणि शरिरातील खराब चरबी काढण्यास साहाय्य करते.

७. स्मरणशक्ती चांगली होणे

तांब्याचे पाणी मेंदूला चालना देणे आणि सक्रीय ठेवणे यांसाठी पुष्कळ उपयुक्त आहे. त्याच्या वापराने स्मरणशक्ती चांगली आणि तीक्ष्ण होते.

केवळ आयुर्वेदच नाही, तर विज्ञानानेही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे लाभदायी असल्याचे सांगितले आहे; पण या पाण्याचा पुरेपूर लाभ, तेव्हाच होतो जेव्हा हे पाणी तांब्याच्या भांड्यात किमान ८ घंटे ठेवले जाते. यामुळेच काही जण रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतात आणि सकाळी हे पाणी पितात.

– मुकुंद बाविस्कर (साभार : ‘इंडिया दर्पण’ वृत्तसंकेतस्थळ)