आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !

‘गोपी म्हणजे सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झाल्याचे एकमेव उदाहरण होय. दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्वरार्पित बुद्धीने, म्हणजे ‘त्याच्यासाठीच, त्याच्या प्रीतीसाठीच करतो’, अशी बुद्धी, भावना असणे आणि त्याचे विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळ किंवा दुःखी होणे, हे भक्तीचे एक द्योतक आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था अशीच असते. ‘भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी’, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती ‘यथा व्रजगोपिकानाम् ।’ (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी.’ व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती ‘अव्यभिचारिणी’ होती. कृष्णाच्या स्मरणात त्या तल्लीन असत; किंबहुना देशकालच नव्हे, तर स्वतःचे देहभानही त्या विसरून जात असत. आदर्श भक्ती म्हणजे ‘गोपींच्या भक्तीसारखी’ एवढीच उपमा दिली जाते; कारण भक्तीचे वर्णन होऊ शकत नाही. ती शब्दांकित होऊ शकत नाही; कारण ती अर्थांकित आहे; म्हणून ‘भक्ती कशी असावी, तर गोपींसारखी’, हे त्याचे उत्तर असते. प्रत्यक्ष गोपींना विचारले, तरी त्या एखाद्या भक्ताचे नाव सांगून ‘त्याच्यासारखी’ एवढेच सांगणार; कारण भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमाचे वर्णन होऊ शकत नाही; म्हणूनच तिला ‘अनिर्वचनीय’ असे म्हणतात. भक्ती म्हणजेच आपला आत्मा !

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.


गोपींची वैशिष्ट्ये

१. सतत भावावस्था

गोपींचे श्रीकृष्णावर एवढे प्रेम होते की, त्या प्रत्येक क्षणी त्याचेच स्मरण करत होत्या. त्यांच्या मनात सर्वत्र श्रीकृष्ण व्यापलेला होता. त्या सूक्ष्मातून, म्हणजेच मनाने सदैव त्याच्याच सेवेत होत्या. त्यामुळे त्यांना स्वतःची शुद्ध हरपायला होत असे. त्यांना सतत श्रीकृष्णाचे स्मरण होत असे. हे स्मरण म्हणजे केवळ स्मरण नसून प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाला मारलेली हाक असायची. त्यांच्या मनात श्रीकृष्णाबद्दलचा भाव काही क्षण, काही घंटे किंवा काही दिवस न रहाता तो सततच असायचा. जशी श्वास घेण्याची क्रिया आपोआप होते, तसे त्यांच्याकडून श्रीकृष्णाचे स्मरण आपोआप होत होते.

२. भाव नव्हे भक्ती

गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव वाढत जाऊन त्यांना भावावस्था प्राप्त झाली. भावावस्थेत त्यांना चैतन्य आणि आनंद मिळत होता. तरीही त्यांची कृष्णतत्त्वाशी एकरूप होण्याची ओढ वाढतच होती. त्यामुळे त्या अल्प काळात ८५ टक्क्यांपेक्षा उच्च पातळीला पोचू शकल्या. भावावस्थेकडून त्यांची वाटचाल भक्तीकडे झाली. भक्ती म्हणजे एकरूपता ! गोपींमध्ये असलेल्या श्रीकृष्णाच्या भक्तीमुळे त्या भावावस्थेत न रहाता भक्तीच्या टप्प्याला लवकर गेल्या.

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १३.५.२००५)