कोरोनामुळे राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ! – प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

मुंबई – कोरोनामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा नियमित चालू नव्हत्या. स्थलांतराचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत आलेली मुले आणि शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभाग अन् टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘बालरक्षक’ या ॲपच्या आधारे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानुसार वर्षभरात शाळेत न गेलेल्या ६ ते १४ वयोगटातील बालकांची संख्या ७ सहस्र ८०६ होती. त्यामध्ये ३ सहस्र ७३० मुलींचा समावेश होता. अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य बालकांची संख्या १७ सहस्र ३९७ होती. यामध्ये ८ सहस्र ३८९ मुली आहेत.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मित्र’ या पूरक शैक्षणिक साहित्याचीही निर्मिती करण्यात आली आहे.