VIDEO : गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी न्यायालयीन लढ्यासाठी पुरावे देण्याचे आवाहन !

विध्वंस केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी हिंदुत्वनिष्ठांची देशव्यापी मोहीम !

रामनाथी (गोवा) – देशपातळीवर श्रीराममंदिर, काशी, मथुरा, कुतुबमिनार, ताजमहल आणि भोजशाळाच नव्हे, तर सहस्रो मंदिरे मुघल, पोर्तुगीज आदी आक्रमकांनी पाडली आहेत. भारत स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंची प्राचीन धार्मिक स्थळे परकीय दास्यत्वात तशीच राहिली. त्यामुळे आक्रमकांनी विध्वंस केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम उघडण्याचा संकल्प समस्त मंदिर संघटना, भक्त, पुरोहित आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आला. यात गोव्यातील विध्वंसित मंदिरांविषयी पुरावे मिळाल्यास त्या विषयी न्यायालयीन लढा दिला जाईल, असा निर्धार गोवा येथील दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी अधिवक्त्यांकडून करण्यात आला. या लढ्यासाठी गोमंतकातील जनतेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे हिंदु जनजागृती समितीला उपलब्ध करून देण्याचे आवाहनही श्री रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृहात (फोंडा, गोवा) १३ जून या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.

डावीकडून अधिवक्ता मदन मोहन यादव, श्री. सुभाष वेलिंगकर, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, श्री. रमेश शिंदे आणि श्री. जयेश थळी

या वेळी व्यासपिठावर सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, वाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन यादव, गोवा येथील भारत माता की जय संघाचे संघचालक श्री. सुभाष वेलिंगकर, गोवा मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मंदिरांचे पुनर्निर्माण करून भारताची सांस्कृतिक परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी शपथबद्ध ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

या वेळी अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याच्या या मोहिमेत पुढील सूत्रे आमच्या संशोधनाचा केंद्रबिंदू राहील. यात विवादित स्थळाचे पौराणिक महत्त्व, नष्ट केल्याची ऐतिहासिक साक्ष, खटल्याचा इतिहास, पुरावे आणि कायदेशीर आधार आदींचा अभ्यास केला जाईल. संशोधनाअंती मंदिरे पाडली गेल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही न्यायालयीन लढा चालू करू. सध्या अनेक विवादित स्थळे पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली असून सदर खाते अधिनियम १९५८ कलम १६ च्या विरुद्ध कृती करत आहे. एक सच्चा हिंदु या नात्याने अशा मंदिरांचे पुनर्निर्माण करून भारताची सांस्कृतिक परंपरा पुनर्स्थापित करण्याची शपथ घेत आहोत.

श्री. सुभाष वेलिंगकर

आक्रमणाच्या विरोधात हिंदू भाविकांनी एकत्र येऊन लढा द्यावा ! – श्री. सुभाष वेलिंगकर

या वेळी भारत माता की जय संघटनेचे गोवा राज्य संघचालक श्री. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, पोर्तुगिजांच्या काळात १ सहस्रहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. यातील २ मंदिरे चर्चच्या आक्रमणांपासून वाचली असून यातील एक वरेण्यपुरी (वेर्णा) येथील आणि दुसरे श्री विजयादुर्गा देवीचे मंदिर आहे. हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित म्हणून घोषित केलेले असतांनाही या मंदिराची भूमी गिळंकृत करण्याचे षड्यंत्र चर्चच्या माध्यमातून चालू आहे. या आक्रमणाच्या विरोधात हिंदू भाविकांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल !

पत्रकार परिषदेतील अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘लुईस गोम्स परेरा यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार गोव्यात सासष्टी, बार्देश आणि तिसवाडी तालुक्यांमध्ये पोर्तुगिजांकडून १ सहस्र ५० मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी न्यायालयीन लढ्याला प्रारंभ झालेला आहे. या लढ्यासाठी अनुभवी अधिवक्त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. गोव्यात पुरातत्त्व खात्याच्या विद्यमान संचालकांची नेमणूक अनधिकृतपणे झाली आहे.’’

या प्रसंगी श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘वर्ष १६६७-६८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज गोवा येथे आले होते. त्या वेळी त्यांना सप्तकोटेश्वर मंदिर पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केल्याचे कळले. यानंतर त्यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. तोच आदर्श आम्ही आज समोर ठेवला आहे.’’

अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘आक्रमकांनी तलवारीच्या बळावर हिंदूंची मंदिरे मिळवली, तर आता आम्ही न्यायालयीन लढा उभारून लेखणीच्या जोरावर परत मिळवू.’’