गुर्वाज्ञापालन म्हणून उरलेल्या आयुष्यात केवळ साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी जगण्याचा स्तुत्य निर्णय घेणारे पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे आई-वडील पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे हे वर्ष २०२१ मध्ये गोव्याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात साधना आणि सेवा करण्यासाठी आले आहेत. त्यांचे सांगली येथील अनेक वर्षांचे रहाते घर आणि शीतपेयाच्या विक्रीचे दुकान, हे सर्व सोडून त्यांनी आता पुढील आयुष्य ईश्वराच्या चरणी समर्पित करण्याचे ठरवले आहे. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.


श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
पू. सदाशिव परांजपे
पू. (सौ.) शैलजा परांजपे

आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असणारे पू. परांजपेआजोबा यांचे कुटुंब !

१. संपूर्ण कुटुंबानेच साधनेचा उच्च स्तर गाठला असणे

‘आज पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे हे दोघे संतपदावर आहेत. त्यांची कन्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि त्यांचे जावई सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे सद्गुरुपदावर आहेत. त्यांच्या इतर दोन मुली सौ. शीतल गोगटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), तसेच त्यांचे जावई श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हेही जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाले आहेत.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी गुरूंवर श्रद्धा ठेवून अन् सर्वस्वाचा त्याग  करून गुरुचरणी संपूर्ण आयुष्य अर्पण करणे

पू. आजोबा आणि पू. आजी यांप्रमाणेच त्यांची कन्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि त्यांचे जावई सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही सर्वस्वाचा त्याग करून केवळ ईश्वरप्राप्तीसाठी गुरुचरणी आयुष्य अर्पण केले आहे. जेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ पूर्णवेळ साधना करू लागले, तेव्हा त्यांनी प्रथम गोव्यामध्ये एक घर घेतले होते. त्या वेळी ते साधनेत नवीन होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिलेही नव्हते; पण ‘केवळ ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायची’, हे ध्येय ठेवून त्यांच्या लहान मुलीला ((सौ. सायली करंदीकर हिला) (पूर्वाश्रमीची कु. सायली गाडगीळ)) घेऊन ते थेट गोव्याला पूर्णवेळ साधना करण्यास आले. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना बोईसरला ‘भाभा अणूसंशोधन केंद्रा’मध्ये संशोधन विभागात उच्चपदावर चांगली नोकरी होती आणि त्यांचे वेतनही उत्तम होते. ‘आपले पुढे काय होईल ? आपल्या मुलीचे कसे होईल ? तिचा विवाह कसा होईल ? आणि त्यासाठी आपल्याकडे पैसे कुठून येणार ?’, असा कोणताही विचार त्यांनी केला नाही. सर्वकाही भगवंतावर सोडून ते अखंड साधना आणि सेवा करत राहिले.

३. ‘भगवंताने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या पदरात मायेच्या एका घराच्या ठिकाणी संपूर्ण विश्वाच्या घराचे दानच घातले आहे’, असे वाटणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणतात, ‘‘घरामध्ये कशाला अडकायचे ? आता गुरूंचे घर, म्हणजे हा आश्रमच आपले घर आहे. साधनेमध्ये आलो आहोत, तर स्वतःचे म्हणून कोणताच अडथळा नको.’’ गेल्या अनेक वर्षांपासून त्या देश-विदेशांत अध्यात्माच्या प्रसारासाठी दिवसरात्र भ्रमण करत आहेत. त्यातून देवाने दाखवून दिले की, ‘देवासाठी त्यांनी एका घराचा त्याग केला असला, तरी ‘हे विश्वचि माझे घर’ या वचनाप्रमाणे आता त्यांचे जीवन झाले आहे. ‘भगवंताने त्यांच्या पदरात मायेच्या एका घराच्या ठिकाणी संपूर्ण विश्वाच्या घराचे दानच घातले आहे’, असे मला वाटते.’

– एक साधक, गोवा (१७.३.२०२२)

१. पुष्कळ कष्ट करून उभे केलेले घर आणि रहदारीच्या ठिकाणी असलेले शीतपेयांचे दुकान विकून केवळ साधना करण्यासाठी गोवा येथे रहाण्यास येणे

३५ ते ४० वर्षांपासून पू. परांजपेआजोबा आणि पू. परांजपेआजी हे सांगली येथे रहात होते. तेथील घर आजोबांनी स्वतः पुष्कळ कष्ट करून आणि पू. आजींनी ते घर अगदी मायेने उभे केले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि त्यांच्या दोन बहिणी हे सर्व जण याच घरात लहानाचे मोठे झाले. तेथे बाजारामध्ये अगदी रहदारीच्या ठकाणी त्यांचे शीतपेयांचे दुकान होते आणि ते चांगले चालत होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘येणारा आपत्काळ हा महाभयंकर आहे. त्यामध्ये तरून जाण्यासाठी ‘तीव्र साधना करणे’, हाच एकमेव उपाय आहे.’’ हे समजल्यावर पू. आजी आणि पू. आजोबा यांनी गुर्वाज्ञापालन म्हणून उरलेल्या आयुष्यात केवळ साधना करून ईश्वरप्राप्तीसाठी जगण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘तीव्र साधना कशी करायची ?’, हे पू. आजोबा आणि पू. आजी यांच्याकडून मला शिकायला मिळाले.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्यावर आज्ञापालन म्हणून लगेच पू. आजी आणि पू. आजोबा यांनी सर्व घर-दाराचा त्याग करणे आणि श्री गुरूंवरील दृढ श्रद्धेचे दर्शन घडवणे

जेव्हा त्यांची कन्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्यांना सर्व सोडून गोवा येथे वास्तव्याला येण्यास सांगितले, तेव्हा दोघांनी कोणतेही कारण न सांगता आपला सर्व भार देवावर सोडून गोव्याला येण्यासाठी आनंदाने होकार दिला. यातून ‘त्यांची त्यागभावना किती उच्च आहे’, हे दिसून येते. सहसा वृद्ध माणसांचे वय झाल्यामुळे त्यांच्यावर झालेले अनेक वर्षांचे संस्कार, त्यांचे रहाणीमान, घर-दार हे सर्व सोडणे त्यांना सहज शक्य नसते. आयुष्यभर केलेला सर्व खटाटोप हा आपले पुढील आयुष्य सुरळीत जावे आणि आपल्याला मनासारखे सुखी अन् निवांत जगता यावे, यासाठी असतो. तेव्हा कोणी ‘आता तुम्हाला हे सर्व सोडून पुन्हा नव्याने प्रयत्न करायचे आहेत’, असे म्हणणे स्वीकारणे जड जाते; पण पू. आजोबा आणि
पू. आजी यांनी ते सहज स्वीकारले अन् साध्य करून दाखवले आहे. त्यांच्या या त्यागामधून त्यांच्या श्री गुरूंवरील दृढ श्रद्धेचे दर्शन होते.

३. अनेक संत आणि सद्गुरु यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सांगली येथील ‘सदानंद’ या घरामध्येही पू. आजी आणि पू. आजोबांनी न अडकणे

पू. आजोबा आणि पू. आजी यांच्या सांगली येथील बंगल्याचे नाव ‘सदानंद’ असे आहे. ‘सदानंद’ या नावाप्रमाणेच त्या वास्तूत रहाणारी सर्व मंडळी ही सदैव आनंदी आहेत. ती देवमाणसेच आहेत. पू. आजोबा आणि पू. आजी यांनी अनेक वर्षे या वास्तूत राहून नामजप केला आहे. या ठिकाणी अनेक सत्कर्मे झाली आहेत. अनेक संत आणि सद्गुरु यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे, तरीही या सर्वांमध्ये तीळमात्र न अडकता हे घर, तसेच त्यांचे चांगले चालू असलेले अन् १०६ वर्षांपेक्षा अधिक जुने झालेले शीतपेयाच्या व्यवसायाचे दुकान सोडून पू. आजोबा आणि पू. आजी गोव्याला आले.

४. पू. आजोबा आणि पू. आजी यांनी घरात न अडकण्याविषयी सांगितलेला उदात्त विचार !

पू. आजोबा आणि पू. आजी यांनी ते घर सोडण्यामागील एक सुंदर अन् शिकण्यासारखा उदात्त विचार सांगितला. ते म्हणाले, ‘‘आम्ही जर त्या जागेमध्ये आमचा जीव अडकवला, तर आमच्यानंतर येथे जे कुणी लोक रहाण्यासाठी येतील, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. अध्यात्मात आलो आहोत, तर ‘कशातही अडकायचे नाही’, हे आपल्याला गुरूंनी शिकवले आहे.’’

पू. आजोबा आणि पू. आजी यांचा हा व्यापक अन् उदात्त विचार सर्वांना शिकण्यासारखा आहे. तसे पहाता संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणी जो कुणी रहाण्यास येईल, त्याचा त्याला लाभच होतो; पण अशा प्रकारे ‘व्यापक विचारांना कृतीची जोड देऊन इतरांसाठी जगणे, हीच खरी साधना आहे’, हे पू. आजोबा आणि पू. आजी यांच्याकडून शिकायला मिळते.

५. पू. परांजपे आजोबा आणि पू. आजी यांच्यातील ‘इतरांना आनंद देण्यासाठी जगणे’ हा दैवी गुण त्यांची कन्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्येही दिसणे

त्यांच्या संपूर्ण जीवनात ते इतरांना आनंद देण्यासाठी जगले आहेत आणि त्यांच्या या दैवी गुणाचे बाळकडू आपल्याला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्येही दिसते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची उच्चतम प्रीती आणि इतरांसाठी जगणे, त्यांना आनंद देण्यासाठी सतत कार्यरत रहाणे, हे त्यांचे दैवी गुण आपण सर्वच जाणतो.

– एक साधक, गोवा (१७.३.२०२२)