(म्हणे) ‘राज्यात कुठेही भारनियमन नाही !’ – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा दावा

ऊर्जामंत्री नितीन राऊत

नागपूर – महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून विजेचे संकट निर्माण झाले आहे. अशातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना राज्यातील वीज संकटावर प्रश्न विचारला असता त्यांनी पळ काढला. ‘राज्यात कोळशाचा तुटवडा नाही. राज्यात कुठेही भारनियमन नाही’, असा दावा त्यांनी केला आहे. जर नितीन राऊत म्हणतात, तसे राज्यात भारनियमन आणि कोळशाचा तुटवडा नाही, तर मग ‘लोकांच्या घरांमध्ये अंधार का?’, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

९ मे या दिवशी दुपारी १ वाजता राज्यात विजेची एकूण मागणी होती २६ सहस्र २५० मेगावॅट आणि राज्य सरकारकडे महाजनको आणि खासगी विद्युत् निर्मिती केंद्र पकडून १६ सहस्र ४४४ मेगावॅट वीज मिळते. ९ सहस्र ६०६ मेगावॅट वीज केंद्र सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यात सध्याच्या स्थितीला १ सहस्र ४८९ ते २ सहस्र मेगावॅटचा तुटवडा आहे.

संपादकीय भूमिका

राज्यात विजेचे भारनियमन होत असतांना ऊर्जामंत्री चुकीची माहिती कशी देतात ? जे सत्य आहे, ते सांगायला त्यांना संकोच वाटतो का ? असे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवतील का ?