(म्हणे) ‘देहली येथे एकप्रकारे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे !’

देहली येथे धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे खापर शरद पवार यांनी फोडले केंद्रशासनावर !

मुंबई – देहली येथे आक्रमणाच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्यात आले. देशाच्या राजधानीत एकप्रकारे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असले, तरी कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे, अशा शब्दांत मत मांडून देहली येथे धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे खापर राष्ट्रवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न केला. २७ एप्रिल या दिवशी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत ते बोलत होते.

या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘आपापसांतील बंधूभाव न्यून करण्यासाठी वक्तव्ये करणे योग्य नाही. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील जनता सर्वधर्मसमभाव मानते. त्यामध्ये हिंदु, मुसलमान वा ख्रिस्ती असो, या सर्वांनी आपापसांतील बंधूभाव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्रामध्येही जर कुणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन हे प्रयत्न अयशस्वी होतील, असे पाहिले पाहिजे.’’ (देहली येथे हनुमान जयंतीनिमित्त हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधाने गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी तेथील अवैध बांधकामांवर कारवाई केली. येथे दंगल कुणी घडवली, हे पवार सांगत नाहीत; मात्र हेच पवार हिंदूंना आतंकवादी म्हणतात ! – संपादक)