वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

मालेगाव बाँबस्फोटातील साक्षीदारांच्या उलट पडताळणीत होत आहेत खुलासे !

काय आहे मालेगाव बाँबस्फोट प्रकरण ?

२९ सप्टेंबर २००८ या दिवशी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलवर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जण घायाळ झाले होते. या प्रकरणातील आरोपींमध्ये भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर द्विवेदी, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश असून हे सर्व सध्या जामिनावर बाहेर आहेत.

मुंबई – संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार (यूपीए)मधील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् आणि त्या वेळीचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तथाकथित ‘हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले होते’, हे सिद्ध करणारे खुलासे आता मालेगाव बॉम्बस्फोट वर्ष २००८ चा खटला चालू झाल्यावर होत आहेत. यामध्ये जे साक्षीदार जमा केले होते, त्यांच्या उलट पडताळणीत सत्य वस्तूस्थिती समोर येऊ लागली आहे.

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् आणि त्या वेळीचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार

१. मालेगाव बाँबस्फोटाचे अन्वेषण ज्या दिशेने चालू होते, त्याची दिशा तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी वळवली आणि त्यामध्ये एक एक करून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक करण्याचा सपाटा लावला होता. त्यामध्ये लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित, भाजपच्या विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली होती. ‘अभिनव भारत या संघटनेचे हे कार्यकर्ते असून त्यांचा हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हेतू होता. हे हिंदु आतंकवादी आहेत’, असेही सिद्ध करण्यात आले होते.

२. त्यासाठी तत्कालीन आतंकवादविरोधी पथकाचे (‘ए.टी.एस्.’चे) प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली हे अटक सत्र चालू होते. त्यांच्या जोडीला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे वर्ष २००८ च्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचे अन्वेषण करतांना आतंकवादविरोधी पथकाचे अतिरिक्त आयुक्त होते. परमबीर सिंह यांच्यावर सध्या खंडणीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आले आहे.

The Malegaon case 2008        (चित्रावर क्लिक करा)

३. मालेगाव प्रकरणी एकूण २२० साक्षीदार आहेत. हा खटला चालू करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत होती; कारण खटला चालू झाल्यावर साक्षीदारांची साक्ष पडताळली जाणार होती. एकदा का साक्षीदारांची उलट पडताळणी चालू झाली, तर साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे मागील वस्तूस्थिती समोर येणार होती, त्यामुळे खटल्यातील आरोपींचे अधिवक्ता हा खटला चालू करण्याची मागणी करत होते, तरीही  खटला चालू केला जात नव्हता.

४. या सर्वांचा परिणाम म्हणून वर्ष २००८ पासून पुढे ९ वर्षे या प्रकरणातील आरोपी कारागृहात खितपत पडले. अखेर त्यांना वर्ष २०१७ मध्ये जामीन संमत झाला. डिसेंबर २०२० पासून हा खटला चालू झाला. हा खटला ‘इन कॅमेरा’ (ध्वनीचित्रीत) घेण्यात यावा, अशी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांची मागणी मान्य करण्यात आली. त्यामुळे हा खटला सध्या इन कॅमेरा चालू झाला आहे. या खटल्यातील १७ साक्षीदारांनी एकामागोमाग एकाने साक्ष फिरवली आहे. यातील साक्षीदारांनी त्यांना ‘त्या वेळच्या ए.टी.एस्. अधिकार्‍यांनी बळजोरीने त्यांची साक्ष नोंदवून घेतली’, असे सांगितले आहे.

साक्षीदारांनी कशा फिरवल्या साक्ष ?

१. एका साक्षीदाराचा वर्ष २००९ मध्ये जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानुसार साक्षीदार हा ‘आरोपी सुधाकर द्विवेदी यांना नाशिकमध्ये भेटण्यासाठी गेला होता. तिथे बैठकीत पुरोहित यांनी हिंदुत्वावर व्याख्यान दिले होते’, असे त्याने जबाबात म्हटले होते. खटल्याच्या वेळी यावर साक्षीदाराने असहमती दर्शवली आणि ‘मी नाशिकमध्ये गेलोच नाही’, असे सांगितले.

२. अन्य एका साक्षीदाराने त्याची साक्ष फिरवत दावा केला होता की, त्याला धमकी देऊन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच इतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांची नावे घेण्यास आतंकवाद विरोधी पथकाने भाग पाडले होते. त्यासाठी त्याला ३-४ दिवस ओलीस ठेवले होते. या दाव्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी काँग्रेस नेत्यांना क्षमा मागण्यास सांगितले होते.

३. या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘आम्ही त्या वेळच्या केंद्र सरकारच्या विरोधात टीका करत असल्यामुळे आम्हाला या प्रकरणात एक एक करत अडकवण्यात आले. आजवर अनेक परकीय आक्रमणकर्ते होऊन गेले; पण कुणीही हिंदूंना आतंकवादी म्हटले नाही; मात्र काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, नेते अहमद पटेल, शकील अहमद, शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि शिवराज पाटील यांनी भगवा आतंकवाद अन् हिंदु आतंकवादी असे लेबल लावले. आता ते सर्वजण देश आणि हिंदुविरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.’’