प.पू. भालचंद्र गावडे महाराज यांनी सनातन संस्थेच्या उत्पादनांमध्ये असलेली सात्त्विकता दर्शवून साधकामध्ये निर्माण केलेली अंतर्मुखता !

प.पू. भालचंद्र गावडे महाराज (चुनवरे, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील दिगंबर अवस्थेतील संत) यांनी सनातन संस्थेच्या उत्पादनांमध्ये असलेली सात्त्विकता दर्शवून साधकामध्ये निर्माण केलेली अंतर्मुखता !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चुनवरे येथील दिगंबर अवस्थेतील प.पू. रामस्वरूप भालचंद्र गावडे महाराज (मूळ नाव – भालचंद्र तातु गावडे) यांनी १८ जानेवारी २०२२ या दिवशी कुडाळ तालुक्यातील करमळगाळू येथे देहत्याग केला. ते ६४ वर्षांचे होते. २७ जानेवारी या दिवशी प.पू. रामस्वरूप गावडे महाराजांचा महाप्रसाद भंडारा झाला. त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

प.पू. भालचंद्र गावडे महाराज यांच्या निवासस्थानी होणार्‍या ‘श्रीराम यागा’च्या निमित्ताने तेथे गेल्यावर त्यांच्या वागण्यातून श्री. सागर चव्हाण यांना सनातनची उत्पादने पुष्कळ सात्त्विक असण्याविषयी आलेली अनुभूती आणि प.पू. महाराजांनी न बोलता केवळ त्यांच्या कृतीतून साधकाच्या मनात निर्माण केलेली अंतर्मुखता येथे दिली आहे.

प.पू. रामस्वरूप भालचंद्र गावडे महाराज

१. प.पू. गावडे महाराज यांनी अंघोळीसाठी नेहमी एका आस्थापनाचाच साबण वापरणे आणि इतर असात्त्विक वस्तू लांब भिरकावून देत असणे

‘प.पू. गावडे महाराज हे दिगंबर अवस्थेतील संत असल्याने ते ५८ वर्षांचे होईपर्यंत पाद्यपूजा करवून घेत नसत. केवळ येणार्‍या भक्तांकडून अंगाला खोबरेल तेल चोळून घेत आणि नंतर त्यांच्याकडून स्नानगृहात अंघोळ घालून घेत असत. असे दिवसभरात वेगवेगळे १५ ते २० भक्त आले, तरीही ते तितक्या वेळा त्यांच्याकडून अंघोळ करवून घेत असत. ते अंघोळीसाठी एका आस्थापनाचाच साबण वापरत असत. अन्य साबण घेतल्यास ते फेकून देत असत. ते मौनावस्थेत असल्यामुळे खुणेनेच सर्व गोष्टी सांगत. इतर असात्त्विक वस्तू लांब भिरकावून देत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणासाठी प.पू. गावडे महाराज यांच्या निवासस्थानी ‘श्रीराम यागा’च्या वेळी सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावणे

‘४ वर्षांपूर्वी चुनवरे, मालवण येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणासाठी ‘श्रीराम याग’ होता. प्रभु श्रीरामचंद्रांनी मला निमित्त करून तेथे माझ्याकडून यज्ञसेवा करवून घेतली. सनातनच्या साधकांनी यज्ञस्थळी सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावले होते. त्या वेळी प.पू. गावडे महाराज आनंदाने वितरण कक्षाजवळ गेले. ते सात्त्विक उत्पादने अत्यंत आनंदाने न्याहाळू लागले. त्यांनी एकही उत्पादन फेकून दिले नाही.

श्री. सागर चव्हाण

३. प.पू. गावडे महाराज यांनी सनातनची उत्पादने आनंदाने आणि आग्रहाने मागून घेऊन वापरणे

३ अ. प.पू. गावडे महाराज यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने वापरून पाद्यपूजा करवून घेणे : यज्ञाचा अग्नि प्रज्वलित करण्यापूर्वी तेथे उपस्थित प.पू. दास महाराज, प.पू. घडशी महाराज आणि प.पू. गावडे महाराज यांचे पाद्यपूजन करण्यात आले. एरव्ही पाद्यपूजन करू न देणार्‍या प.पू. भालचंद्र गावडे महाराज यांनी सनातनचे अष्टगंध, कुंकू आणि अत्तर या सात्त्विक उत्पादनांचा वापर करून पाद्यपूजा करवून घेतली.

३ आ. प.पू. गावडे महाराज यांनी यज्ञाच्या वेळी केवळ सनातनची सात्त्विक उत्पादने वापरणे : प.पू. भालचंद्र गावडे महाराज यांनी मला तेथील सनातनचे अत्तर हातात घेऊन ते खोबरेल तेलाप्रमाणे त्यांच्या डोक्यावर चोळायला सांगितले. त्यांनी ते मोठ्या प्रेमाने न्याहाळून ते स्वतःच्या डोके, हात आणि पाय यांच्या तळवे यांनाही चोळून घेतले.

३ आ १. प.पू. गावडे महाराज यांनी अंघोळीसाठी त्यांना नेहमी आवडणारा साबण फेकून देऊन सनातनचा साबण वापरणे : नंतर त्यांना अंघोळीसाठी घेऊन जाण्यापूर्वी मी सनातनचा साबण घेऊन गेलो. त्या वेळी त्यांची वहिनी मला म्हणाली, ‘‘ते नेहमीच्या साबणाविना कुठलाही साबण वापरणार नाहीत.’’ मी पटकन म्हणालो, ‘‘हा सनातनचा साबण आहे.’’ त्या वेळी त्यांनी नेहमीचा साबण फेकून दिला आणि सनातनच्या साबणाचा सुगंध घेऊन तो अंगाला लावायला सांगितला.

४. प.पू. गावडे महाराज यांनी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व लक्षात आणून देऊन अंतर्मुख करणे

४ अ. साधक पूर्वी धर्मनिरपेक्षतावादी विचारांचा असल्यामुळे आरंभी त्याने सनातनकडे दुर्लक्ष करणे : विशेष म्हणजे माझ्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ नुकताच झाला आहे. पूर्वी मी धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीचा होतो. तेव्हा मी सनातनचा तिरस्कार करायचो. माझ्यात ‘अहं’चे प्रमाण पुष्कळ होते आणि आताही आहे. ‘सनातनच्या साधकांनाच देव दिसतात का ? यांनाच सगळे समजते का ?’, असे म्हणत मी सनातनकडे दुर्लक्ष करायचो; पण प.पू. भालचंद्र गावडे महाराज यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने वापरून मला अंतर्मुख केले.

४ आ. प.पू. गावडे महाराज सनातनची उत्पादने वापरतात, म्हणजे ‘त्यात काहीतरी विशेष आहे’, याची साधकाच्या मनाला जाणीव होणे : मी विचार करू लागलो, ‘उन्हातान्हात पडून रहाणारे, अंगावर वस्त्र धारण न करणारे, म्हणजे दिगंबर अवस्थेतील संत प.पू. भालचंद्र गावडे महाराज सनातनची उत्पादने वापरतात, म्हणजे यात काहीतरी निश्चित असणार !’ या जिज्ञासेपोटी मी सनातनची सात्त्विक उत्पादने वापरू लागलो. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ वाचायला लागलो. आता मला कुठल्याही प्रयोगाची आवश्यकताच राहिली नाही कि माझ्या मनात किंतु-परंतु राहिला नाही. दत्त दिगंबर श्री भालचंद्र महाराज यांनी सनातनच्या उत्पादनांतील सात्त्विकता त्यांच्या कृतीतून मला दाखवून दिली.

५. अनुभूती

यागाच्या वेळी प्रभु श्रीरामाच्या चरणकमलांचे दर्शन होणे, ते चरणकमल आणि सनातनच्या साधकांनी काढलेल्या प्रभु श्रीरामाच्या चरणकमलांचे चित्र यांमध्ये सारखेपणा दिसणे, तेव्हा सनातनविषयी असलेला विकल्प दूर होणे : ‘श्रीराम यागा’च्या वेळी ‘सनातनच्या साधकांना अनिष्ट शक्तींपासून होणारा त्रास नष्ट होऊ दे आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती विहंगम मार्गाने होऊ दे’, असा समष्टी संकल्प प्रभु रामचंद्राने मला निमित्त करून करवून घेतला. यज्ञविधीजवळ मला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करण्यासाठी बसवले होते. तेव्हा परम दयाळू श्रीरामाने आपल्या विशाल निळसर कोमल चरणकमलांचे दर्शन देऊन मला कृतार्थ केले. तेव्हा प्रभु श्रीरामाने मला दाखवलेले त्याचे चरणकमल आणि सनातनचे संत अन् साधक यांनी रेखाटलेल्या चरणांमध्ये मला साम्य जाणवले. त्या वेळी सनातनविषयी माझ्या मनात असलेला विकल्प दूर झाला.

६. यागाच्या ठिकाणी सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्याची संधी मिळाल्याने समष्टी सेवा होणे 

चुनवरे येथील पुढील ‘यागा’साठी साधकसंख्या अल्प असल्याने ‘सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावता येणार नाही’, असे साधकांनी मला सांगितले. तेव्हा मी स्वतःच साधकांकडे जाऊन थोडी उत्पादने आणि ग्रंथ घेऊन आलो. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कृपावंत होऊन माझ्याकडून समष्टीसेवेचा आरंभ करवून घेतला.

७. ‘सनातनच्या उत्पादनांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चरणांजवळ घेतले’, असे वाटणे 

या ४ वर्षांच्या कालावधीत माझे प्रारब्ध आणि अनंत अडचणी दूर करत त्यांनी मला रामनाथी आश्रमात त्यांच्या चरणकमलांजवळ आणले. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे समष्टी रूप असलेली सात्त्विक उत्पादने हेच माध्यम होते. सनातनची उत्पादने अधर्म माजलेल्या या लोकांत सात्त्विकता पसरवतात. साधक, धर्मप्रेमी, अर्पणदाते, विज्ञापनदाते यांच्यामध्ये आणि मंदिरे, मठ अन् विविध ठिकाणी होणारे यज्ञयाग या ठिकाणी ही सात्त्विक उत्पादने अनिष्ट शक्तींशी सूक्ष्मातून लढून तेथे सात्त्विकता निर्माण करतात. अशा या सनातनच्या सात्त्विक उत्पादनांप्रती पुष्कळ कृतज्ञता !

८. प्रार्थना : ‘प.पू. गावडे महाराज यांनी माझ्यासारख्या जिवाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतीसाठी पाठवले. प.पू. तुम्हीच मला तुमच्या चरणांमध्ये सामावून घेऊन अखंड शरणागती द्या.

‘नको तन-मन-धन यांची आसक्ती । आता द्यावी मजला केवळ तुमच्या चरणांमध्ये शरणागती ।’, हीच प्रार्थना तुमच्या चरणी !

जीव झाला कासावीस आता । तूच माझा पिता अन् त्राता ।
घे रे माझे सर्वस्व आता । तूच या विश्वाचा कर्ता-करविता ।।’

– श्री. सागर चव्हाण, मालवण, सिंधुदुर्ग. (२६.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक