गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणांविरोधात ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आणि आंदोलन पार पडले !

मुंबई – पुरातत्व खात्याच्या अनुमतीनेच कुठलीही ऐतिहासिक वास्तू, गड यांच्या संवर्धनाची कामे करता येतात; मात्र मुंबईजवळील कुलाबा किल्ल्याच्या थेट तटबंदीवरच एक मजार (थडगे) बनवण्याचा प्रयत्न व्हावा, हा एक वेगळाच उन्माद आहे. थडगे बांधून अतिक्रमण करण्याच्या केलेल्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे.

पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे, अशी चेतावणी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गड-दुर्गांवर इस्लामी आक्रमण-पुरातत्व खाते करतेय काय ?’, या विषयावर १६ जानेवारी २०२२ या दिवशी ऑनलाईन विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये ते बोलत होते.

श्री. रघुजीराजे आंग्रे

या विशेष संवादामध्ये ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक आणि सांगली येथील माजी आमदार श्री. नितीन शिंदे, कोल्हापूर येथील ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज काटकर, ‘झुंज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. मल्हार पांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आदींनी संबोधित केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ५ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिले.

श्री. नितीन शिंदे

गडांवर अनधिकृत दर्गे उभारले जात असल्याविषयी पुरातत्व खात्याला जनतेने जाब विचारला पाहिजे ! – नितीन शिंदे, माजी आमदार, भाजप आणि श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक

महाराष्ट्रात अफझलखानाच्या नावे ट्रस्ट उभा केला जातो. प्रतापगड, विशाळगड, रायगड यांसह अनेक गडांवर अनधिकृत दर्गे उभारले जातात आणि त्याचे रूपांतर नंतर मोठ्या मशिदीत केले जाते. हे सर्व होऊ देणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांना महाराष्ट्रातील जनतेने जाब विचारला पाहिजे !

श्री. युवराज काटकर

दोषींवर कारवाई करून गड-दुर्गांवरील सर्व अतिक्रमणे नष्ट करावीत ! – युवराज काटकर, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर

विशाळगडावर साधारणतः ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील मंदिरांकडे पुरातत्व विभागासह प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात ज्या गड-दुर्गांच्या ठिकाणी अवैध मजार, दर्गा आणि मशिदी उभारून अशा प्रकारची विविध अतिक्रमणे झाली आहेत, त्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून ही सर्व अतिक्रमणे नष्ट करावीत.

श्री. मल्हार पांडे

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी दुर्ग आणि शिव प्रेमी यांनी पुढे येणे आवश्यक ! – मल्हार पांडे, संस्थापक अध्यक्ष, झुंज प्रतिष्ठान

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी दुर्ग आणि शिव प्रेमी यांनी पुढे येणे आवश्यक आहे. जर आपण पुढे आलो नाही, तर आपला जो इतिहास आहे, तो काळाच्या पडद्याआड जाईल. केंद्र सरकार आणि केंद्रीय पुरातत्व खाते यांना पुराव्यांनिशी निवेदन दिल्यास अन् पाठपुरावा घेतल्यास नक्कीच पालट होईल, याविषयी आम्हाला विश्वास आहे.

श्री. सुनील घनवट

गडांवर अवैध बांधकाम वा अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करायला हवेत ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे आता रक्षण होतांना दिसत नाही. गड-दुर्गांवर अतिक्रमणे होत असून त्याचे हिरवेकरण होत आहे. महाराष्ट्रातील अनेक गड-दुर्गांच्या ठिकाणी अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करावेत, तसेच पुरातत्व खात्यातील संबंधित दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.


हे पहा –

गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमण ! पुरातत्त्व खाते करतेय काय ?


गड-दुर्गांवरील लँड जिहाद रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची ‘ऑनलाईन’ आंदोलनाद्वारे मागणी

गड-दुर्गांवरील लँड जिहाद रोखण्यासाठीच्या आंदोलनात हस्तफलक हातात घेऊन सहभागी झालेले शिवप्रेमी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील ३०० हून अधिक गड-दुर्ग हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत; मात्र पुरातत्व विभाग, राज्य आणि केंद्र सरकार यांच्या अक्षम्य दायित्वशून्यतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा इस्लामी अतिक्रमणांच्या विळख्यात अडकत चालला आहे. गेल्या काही दिवसांत रायगड, विशाळगड, कुलाबा, लोहगड, वंदनगड आदी गड-दुर्गांवर अशी अतिक्रमणे असल्याचे लक्षात आले आहे. हे वेळीच रोखले नाही, तर ‘गड-दुर्गांवर कबरी, दर्गे आणि मशिदी उभा राहिलेल्या दिसतील. गड-दुर्गांचे हे इस्लामीकरण रोखण्यासाठी त्यांवरील सर्व अवैध थडगी, मजारी, दर्गे, मशिदी आदी हटवण्यात याव्यात. गड-दुर्गावर होत असलेला एक प्रकारचा लँड जिहाद रोखावा’, या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन १६ जानेवारी २०२२ या दिवशी राज्यव्यापी ‘ऑनलाईन’ आंदोलन केले. ही आंदोलने राज्यभरात विविध गडांच्या पायथ्याशी, त्या त्या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. या वेळी प्रशासन, पुरातत्व खाते, केंद्र आणि राज्य सरकार यांना निवेदने देण्यात आली.

या आंदोलनात ‘गड-किल्ले हिंदूंच्या अस्मिता आहेत, त्याचे इस्लामीकरण खपवून घेतले जाणार नाही !, गड-दुर्गांची दुरवस्था असतांना पुरातत्व खाते झोपा काढत आहे का ?, हिंदु बांधवांनो जागे व्हा, आपल्या गड-दुर्गांच्या रक्षणासाठी एक व्हा !’, आदी आशय असलेले विविध हस्तफलक घेऊन जागृती करण्यात येत आली. हिंदु जनजागृती समितीने याविषयी ट्विटरवर केलेल्या ‘#SaveForts_OpposeLandJihad’ या ट्रेंडला (चर्चेत असलेल्या विषयाला) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा विषय ट्विटरवर चौथ्या स्थानी होता.