सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली मुद्रा करून नामजप केल्याने कोची सेवाकेंद्रातील साधकांना झालेले लाभ !

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. कु. रश्मि परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

१ अ. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांत वाढ होणे : ‘माझा आध्यात्मिक त्रास वाढल्याचे काही दिवसांपासून मला जाणवत होते. मी स्वतःवरील आवरण काढले, तरीही काही वेळाने मला पुन्हा त्रास व्हायचा. माझा शारीरिक त्रास वाढला होता. अंगदुखी, थकवा आणि संधीवाताच्या वेदना यांमुळे मला सेवा करायला जमत नव्हते. मला मानसिक स्तरावरही निरुत्साह जाणवत होता.

१ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय

१ आ १. हाताच्या बोटांची मनोर्‍याप्रमाणे मुद्रा करून शरिरावरील आवरण काढायला सांगणे : मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या त्रासाविषयी सांगितले. तेव्हा सद्गुरु काका मला म्हणाले, ‘‘आता अनिष्ट शक्ती सर्वच चक्रांवर आवरण आणतात. त्यामुळे कितीही वेळा आवरण काढले, तरी त्रास न्यून होत नाही. त्यासाठी एक नवीन मुद्रा आहे. दोन्ही हातांची मधली बोटे एकमेकांशी जोडायची आणि मनगट शरिराला चिकटवून एका ‘टॉवर’सारखी आकृती सिद्ध करायची. ही मुद्रा स्वाधिष्ठान चक्रापासून डोक्याच्या मागच्या बाजूपर्यंत फिरवायची. जिथे त्रास आहे, त्या चक्राच्या ठिकाणी अधिक वेळ अशी मुद्रा करू शकतो. असे ७ – ८ वेळा केल्याने आवरण न्यून होईल आणि नंतर प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधता येईल. अधूनमधून अशी मुद्रा करून आवरण काढायचे.’’ सद्गुरु काकांनी मला नामजप, न्यास आणि मुद्रा सांगितली.

१ आ २. हाताच्या बोटांची मनोर्‍याप्रमाणे मुद्रा केल्याने शरिरावरील आवरण अल्प वेळेत नाहीसे होणे : सद्गुरु काकांनी सांगितलेली मुद्रा करून स्वतःवरील आवरण काढल्याने अल्प वेळेत आवरण नाहीसे होते. त्यानंतर नामजप, सेवा किंवा स्वयंसूचना सत्रे व्यवस्थित करता येतात. कोचीन सेवाकेंद्रातील अन्य साधकांनीही हा प्रयोग करून बघितला आणि त्यांनाही याचा लाभ झाला.’

२. श्री. नंदकुमार कैमल

‘सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांनी सांगितलेली मनोर्‍याप्रमाणे मुद्रा करून आवरण काढणे चालू केल्यावर मला जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

अ. पूर्वी मला सकाळी एक-दीड घंटा थकवा जाणवायचा; मात्र सकाळी उठल्यावर या पद्धतीने आवरण काढल्यावर थकवा येत नाही आणि उत्साहाने सेवा करता येऊ लागली.

आ. पूर्वी मला दैनिक ‘सनातन प्रभात’ने दिवसभरात १० ते १२ वेळा आवरण काढावे लागत असे. आता अशी मुद्रा करून आवरण काढल्यावर मला २ – ३ घंटे उत्साहाने सेवा करता येऊ लागली.

इ. सकाळी एक घंटा आणि दुपारी एक घंटा नामजप करतांना पूर्वी मला झोप येण्याचे प्रमाण अधिक होते. अशी मुद्रा करून आवरण काढल्याने आता माझे मन नामजपावर लवकर एकाग्र होते आणि मला नामजप करतांना झोप येत नाही.

ई. पूर्वी माझ्या मनात नकारात्मक विचार आल्यास ते १५ ते २० मिनिटे टिकून रहात. आता अशी मुद्रा करून आवरण काढल्यावर मनातील नकारात्मक विचार लगेच नष्ट होतात.

उ. अशी मुद्रा करून आवरण काढल्यावर माझा उजवा हात दुखण्याचे प्रमाण अल्प झाले. मला दुखण्यामध्ये ५० ते ६० टक्के परिणाम जाणवला.

३. कु. प्रणिता सुखटणकर आणि श्री. बालकृष्ण नायक

अ. ‘अशी मुद्रा करून आवरण काढल्याने प्रत्येक चक्रावरील आवरण लवकर नष्ट होत असल्याचे जाणवते.

आ. शरिरावरील आवरण लवकर न्यून झाल्याने उत्साह जाणवतो आणि मनाची स्थितीही सकारात्मक असते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ७.२.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक